नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : आयपीएलमध्ये सध्या सर्व संघ गुणतालिकेत (IPL Points Table) पहिल्या चारमध्ये येण्यासाठी स्पर्धा करत आहेत. प्ले ऑफ गाठण्यासाठी प्रत्येक संघाला 16 गुणांची गरज आहे. रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात झालेल्या सामन्यात बॅंगलोरनं मोठा विजय मिळवला. एबी डिव्हिलियर्सने (AB De villiers) 33 चेंडूत 73 धावांची जबरदस्त खेळी करत कोलकाताला 82 धावांनी पराभूत केले. यासह बॅंगलोरचा संघ 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
तर, कोलकाताचा संघ 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. या सामन्यात टॉस जिंकत बॅंगलोरनं फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार विराट कोहली आणि डिव्हिलियर्स यांनी 7.4 ओव्हरमध्ये नाबाद 100 धावांची भागीदारी करत 194 धावांचे लक्ष उभे केले. याचा पाठलाग करताना कोलकाताची हालत खराब झाली. 20 ओव्हरमध्ये कोलकातानं केवळ 112 धावा केल्या.
गेल्या 12 वर्षात एकदाही बॅंगलोर संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही आहे. त्यामुळे यंदा आरसीबी शानदार खेळी करत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. RCBचा संघ आता दिल्ली आणि मुंबईला टक्कर देत आहे. RCBनं 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर 2 गमावले आहेत. 10 गुणांसह RCBचा नेट रन रेट -0.116 आहे.
टॉपवर आहे मुंबई आणि दिल्ली
आयपीएल 2020 पॉइंट टेबलवर आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे राज्य असल्याचे दिसत आहे. मुंबईनं 7 पैकी 5 सामने जिंकत पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईचा नेट रन रेट 1.327 आहे. तर, दिल्लीचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीनेही 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. त्यांचा नेट रन रेट 1.038 आहे.
या संघाची अवस्था खराब
राजस्थान आणि हैदराबाद या दोन संघाना प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. तर चेन्नई आणि पंजाब संघ तळाशी आहेत. या दोन्ही संघाचे प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे जवळजवळ अशक्य आहे.