मुंबई, 30 जुलै : श्रीलंकेविरुद्धच्या 3 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा (India vs Sri Lanka) 2-1 ने पराभव झाला. सीरिज गमावल्यानंतरही टीमचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) निराश झाला नाही. या पराभवानंतरही टीममधल्या युवा खेळाडूंना शिकण्याची संधी मिळाली. सगळ्या विकेट सपाट नसतात, तुम्हाला कमी स्कोअर असलेल्या खेळपट्टीवर खेळण्याची कला शिकावी लागेल, हे खेळाडूंना समजल्याचं राहुल द्रविड म्हणाला.
पहिली टी-20 जिंकल्यानंतर कृणाल पांड्याची (Krunal Pandya) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या 9 खेळाडूंना अखेरच्या दोन टी-20 खेळता आल्या नाहीत. खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे टीमचं संतुलन बिघडलं. तसंच खेळाडूंकडे अनुभवाची कमी असल्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला. अखेरच्या दोन टी-20 मध्ये भारताकडून 5 खेळाडूंनी पदार्पण केलं.
भारतीय बॅट्समननी निराशा केली का? असा प्रश्न राहुल द्रविडला विचारला असता त्याने नाही असं उत्तर दिलं. 'मी अजिबात निराश नाही, कारण सगळे खेळाडू तरुण आहेत. ते अनुभवातून शिकतील. या प्रकारची परिस्थिती आणि बॉलर्सचा सामना करून त्यांना शिकता येईल. श्रीलंकेच्या टीमची बॉलिंग खूप चांगली आहे,' असं द्रविडने सांगितलं.
'त्यांना आणखी रन करण्याची इच्चा असेल, पण प्रत्येक खेळपट्टी सपाट नसते, ये त्यांना समजलं. अशा खेळपट्ट्यांवर आम्हाला 130-140 रन करणं शिकावं लागेल. खेळाडू आत्मचिंतन करून पुढे चांगली रणनिती आखू शकतील. टी-20 क्रिकेटमध्ये अशाप्रकारची परिस्थिती जास्त वेळा उद्भवत नाही, पण असं झालंच तर तुम्हाला चांगला खेळ दाखवणं जमलं पाहिजे. बॅट्समनसाठी ही परिस्थिती चांगली नव्हती. त्यांना भविष्यातही अशा परिस्थितीचा सामना करावा लागेल, त्यामुळे त्यांना या अनुभवाचा फायदा होईल,' असं राहुल द्रविडला वाटतं.
भारताने टी-20 सीरिजची पहिली मॅच 38 रनने जिंकली होती, यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये श्रीलंकेचा 4 विकेटने आणि तिसऱ्या सामन्यात 7 विकेटने विजय झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.