मुंबई, 19 जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध (India vs England) घरच्या मैदानात 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. 5 फेब्रुवारीपासून या सीरिजला सुरूवात होणार आहे. या सीरिजच्या पहिल्या दोन टेस्टसाठी आज टीमची निवड होईल. चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच भारतीय टीमची निवड होणार आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) च्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकल्यामुळे आता अजिंक्यलाच टेस्ट टीमचा कर्णधार ठेवावं, अशी मागणी क्रिकेट रसिक करत आहेत. पण चाहत्यांची ही मागणी बीसीसीआय पूर्ण करेल, याची शक्यता अजिबात नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टनंतर विराट कोहली (Virat Kohli) पितृत्वाच्या रजेसाठी भारतात परतला. ऍडलेड टेस्टमध्ये भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. फक्त 36 रनवरच भारतीय टीम ऑल आऊट झाली. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा निचांकी स्कोअर होता. यानंतर अजिंक्य रहाणेकडे टीमची सूत्र आली, आणि मग भारताने मागे वळून पाहिलं नाही.
मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताने विजय मिळवला, तर सिडनीमध्ये झालेली तिसरी टेस्ट भारतीय बॅट्समननी संघर्ष करून ड्रॉ केली, यानंतर ब्रिस्बेनमध्येही विजय संपादन करत अजिंक्यने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी हातात घेतली.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात अजूनही भारताचा पराभव झालेला नाही. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशालामध्ये आणि अफगाणिस्तानविरुद्ध बंगळुरूमध्ये विजय मिळवला होता, त्यामुळे आता अजिंक्यकडेच नेतृत्व ठेवावं, अशी मागणी अनेक क्रिकेट चाहते करत आहेत.
27 जानेवारीला बायो-बबलमध्ये प्रवेश
या टेस्ट सीरिजच्या पहिल्या दोन मॅच 5-9 फेब्रुवारी आणि 13-17 फेब्रुवारीदरम्यान चेन्नईमध्ये होणार आहेत. यासाठी भारतीय टीम 27 जानेवारीला बायो-बबलमध्ये प्रवेश करेल. पहिल्या दोन टेस्टसाठी 16-18 खेळाडूंची निवड होऊ शकते, तसंच काही नेट बॉलरनाही संधी दिली जाऊ शकते.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.