अहमदाबाद, 25 फेब्रुवारी : अहमदाबाद टेस्टमध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा (India vs England) 10 विकेटने पराभव केला, पण टीम इंडियाच्या या विजयानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. दोनच दिवसांमध्ये ही टेस्ट मॅच संपली. दुसऱ्या दिवशी तर तब्बल 17 विकेट पडल्या. यानंतर इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूंनी खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले. फक्त इंग्लिश खेळाडूच नाही तर भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने (Yuvraj Singh) या खेळपट्टीवर टीका केली आहे.
'फक्त दोन दिवसातच मॅच संपली. हे टेस्ट क्रिकेट आहे का नाही ते माहिती नाही. जर अनिल कुंबळे आणि हरभजनला अशा खेळपट्ट्या मिळाल्या असत्या, तर त्यांच्या एक हजार आणि 800 विकेट असत्या. विजयाबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन. अक्षर पटेलची शानदार बॉलिंग. अश्विन आणि इशांत शर्मालाही शुभेच्छा,' असं ट्विट युवराज सिंगने केलं.
फक्त युवराजच नाही तर मॅचमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनीही खेळपट्टीवर टीका केली. ही आदर्श टेस्ट विकेट नव्हती, भारतात टेस्ट क्रिकेटसाठी पिचचा वरचा भाग टणक असला पाहिजे आणि तिसऱ्या दिवशी बॉल स्पिन झाला पाहिजे. पण या खेळपट्टीवर ज्या तंत्राची आवश्यकता होती, ते बॅट्समनकडे नव्हतं, असं लक्ष्मण म्हणाला.
'खेळपट्टी दोन्ही टीमसाठी बरोबर होती, पण दोन दिवसात टेस्ट संपणं योग्य नाही. एवढं मोठं स्टेडियम बनवलं, पण खेळपट्टी खराब आहे. फक्त पाच सत्रांमध्ये 30 विकेट पडल्या. हे चुकीचं आहे. दोन दिवसात मॅच संपली, म्हणजे नक्कीच काहीतरी चूक आहे,' अशी प्रतिक्रिया हरभजनने दिली.
एकीकडे या खेळपट्टीवर हरभजन, युवराज आणि लक्ष्मण यांनी टीका केली, तर दुसरीकडे विराटने मात्र खेळपट्टीमध्ये काहीही खराब नसल्याचं सांगितलं. 30 पैकी 21 विकेट सरळ बॉलवर पडल्या, हा खराब बॅटिंगचा पुरावा आहे, असं विराट कोहली म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.