लाहोर, 2 मार्च : पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनेही (Shoaib Akhtar) आता भारतातल्या खेळपट्टीच्या (Indian Pitches) वादात उडी घेतली आहे. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टसाठी (India vs England) वापरलेली खेळपट्टी लायक नव्हती, असं शोएब म्हणाला आहे. शोएब अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट करत या वादावर भाष्यं केलं आहे.
'मला वाटतं टीम इंडिया खूप मजबूत आहे. त्यामुळे त्यांनी टेस्ट मॅचसाठी चांगली खेळपट्टी तयार करायला पाहिजे होती. टेस्टसाठी चांगली खेळपट्टी तयार केली असती, तरी भारताने इंग्लंडला हरवलं असतं. त्यांना घाबरण्याचीही गरज नाही आणि डे-नाईट टेस्टसाठीची खेळपट्टी बनवण्याचीही गरज नाही,' असं शोएब म्हणाला.
'मेलबर्नमध्ये भारताला मदत करणारी खेळपट्टी बनवण्यात आली होती का? तरीही त्यांचा विजय झाला. भारत ऑस्ट्रेलियात सीरिज कशी जिंकला? याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. अशा खेळपट्टीवर टेस्ट मॅच नकोत, मॅच फक्त दोन दिवसांमध्येच संपली. कोणतंही कारण नसताना बॉल जास्त स्पिन होत होता. टेस्ट क्रिकेटसाठी हे योग्य नाही. टेस्ट क्रिकेटच्या लोकप्रियतेसाठीही हे चांगलं नाही,' अशी प्रतिक्रिया शोएबने दिली.
'घरच्या परिस्थितीचा फायदा घेणं मी समजू शकतो, पण असा फायदा घेणं जरा जास्तच होतं. भारताने 400 रन करून इंग्लंडचा 200 रनवर ऑल आऊट झाला असता तर इंग्लंड खराब खेळली, असं आपण म्हणू शकलो असतो. पण इकडे भारताचाही 145 रनवर ऑल आऊट झाला. जर भारत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानांवर हरवू शकतो, तर त्यांना स्पिनरसाठी खेळपट्टी बनवण्याची गरज नव्हती,' असं वक्तव्य शोएबने केलं.
अहमदाबादच्या डे-नाईट टेस्टमध्ये स्पिन बॉलरनी तब्बल 28 विकेट घेतल्या. यातल्या अश्विन आणि अक्षर पटेलच्या नावावर 18 विकेटचा समावेश आहे. या दोघांच्या भेदक बॉलिंगपुढे इंग्लंडचा दोन्ही इनिंगमध्ये 112 आणि 81 रनवर ऑल आऊट झाला. भारतीय टीमलाही पहिल्या इनिंगमध्ये फक्त 145 रनच करता आल्या. इंग्लंडचा कर्णधार आणि काम चलाऊ स्पिनर जो रूट याने पहिल्या इनिंगमध्ये भारताच्या 5 विकेट घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket, India, India vs england, Shoaib akhtar