चेन्नई, 14 फेब्रुवारी : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England) 329 रनवर ऑल आऊट झाला आहे. दिवसाची सुरूवात 300-6 अशी करणाऱ्या भारताच्या पुढच्या 4 विकेट फक्त 29 रनवर गेल्या. ऋषभ पंत (Rishabh Pant) 58 रनवर नाबाद राहिला. या इनिंगमध्ये भारताचे 4 बॅट्मन शून्य रनवर आऊट झाले. शुभमन गिल, विराट कोहली, इशांत शर्मा आणि कुलदीप यादव यांना खातंही उघडता आलं नाही.
टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. पण रोहित शर्मा (Rohit Sharma)ने पहिले चेतेश्वर पुजारा आणि मग अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ला घेऊन भारताचा डाव सावरला. रोहित शर्माने 161 रनची तर अजिंक्य रहाणेने 67 रनची खेळी केली. रोहित आणि अजिंक्य यांच्यात चौथ्या विकेटसाठी 310 बॉलमध्ये 162 रनची पार्टनरशीप झाली. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर ओली स्टोनला 3 विकेट, जॅक लीचला 2 आणि जो रूटला एक विकेट मिळाली.
या मॅचमध्ये विराटने टीममध्ये तीन बदल केले आहेत. शाहबाज नदीमऐवजी अक्षर पटेल, जसप्रीत बुमराहऐवजी मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरऐवजी कुलदीप यादवला संधी दिली आहे.
याआधी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 227 रनने पराभव झाला होता. इंग्लंडचा भारतीय भूमीवरचा सगळ्यात मोठा विजय होता, तसंच भारताने 22 वर्षानंतर पहिल्यांदाच चेन्नईमध्ये टेस्ट मॅच गमावली. चार टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये आता इंग्लंड 1-0 ने पुढे आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (ICC World Test Championship Final) प्रवेश मिळवण्यासाठी आता भारताला फक्त दुसरी टेस्टच नाही, तर सीरिजही जिंकावी लागणार आहे. दुसऱ्या टेस्टमध्येही जर भारताचा पराभव झाला, तर विराटचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळण्याचं स्वप्न भंगेल. 18 ते 22 जूनदरम्यान लॉर्ड्सवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल. न्यूझीलंडची टीम आधीच या फायनलमध्ये पोहोचली आहे. आता भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी स्पर्धा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.