नॉटिंघम, 3 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला बुधवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियात कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने याबाबतचे संकेत दिले आहेत. शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) ऑलराऊंडर म्हणून संधी दिली जाऊ शकते, असं रहाणे म्हणाला आहे. भारतीय टीममध्ये हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) जागा कोण घेऊ शकतो? असा प्रश्न अजिंक्यला विचारण्यात आला. यानंतर त्याने शार्दुल ठाकूरचं नाव घेतलं. शार्दुलने ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये अर्धशतकीय खेळीसोबतच मॅचमध्ये 7 विकेटही घेतल्या होत्या.
'प्रत्येक जण वेगळ्याप्रकारचा खेळाडू आहे. हार्दिकने 2018 साली जे केलं ते आमच्यासाठी वेगळं होतं. शार्दुल बॅटिंग करू शकतो. ऑस्ट्रेलियामध्ये तुम्ही त्याला बघितलंत. स्थानिक क्रिकेटमध्येदेखील त्याने चांगली कामगिरी केली आहे,' असं वक्तव्य रहाणेने केलं. शार्दुलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 16.58 च्या सरासरीने 7 अर्धशतकं केली आहेत.
'बुमराह, शमी, सिराज, उमेश आणि इशांतही बॅटिंगचा सराव करत आहेत. इनिंगच्या शेवटी आम्ही ज्या 20-30 रन करतो त्या महत्त्वाच्या आहेत. बॉलर्स नेटमध्ये 10-12 मिनीटं बॅटिंग करू इच्छितात. याचा परिणाम नंतर दिसेल. आम्ही तळाच्या खेळाडूंकडून चांगल्या बॅटिंगची अपेक्षा करत आहोत,' असं रहाणे म्हणाला.
चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) संथ बॅटिंगवरही रहाणेला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने जोपर्यंत टीम मॅनेजमेंटकडून संदेश मिळत नाही, तोपर्यंत प्रत्येकाने आपला नैसर्गिक खेळ खेळावा, असं उत्तर रहाणेने दिलं.
इंग्लंडमधल्या खेळपट्टीवर गवत असेल हे आम्हाला माहिती आहे. भारतीय खेळाडूंना फास्ट बॉलरना अनुकूल असलेल्या परिस्थितीमध्ये मुकाबला करण्याची गरज आहे. आम्हाला पिचची चिंता नाही, असं रहाणेने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.