अहमदाबाद, 19 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली पाचवी टी-20 शनिवारी खेळवण्यात येणार आहे. 2-2 ने ही सीरिज बरोबरीत असल्यामुळे पाचव्या मॅचला महत्त्व प्राप्त झालं आहे, पण या मॅचमध्ये कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुढे नवी डोकेदुखी उभी राहिली आहे. सीरिजमध्ये वारंवार अपयशी ठरत असलेल्या केएल राहुल (KL Rahul) याला विराटने प्रत्येक मॅचमध्ये संधी दिली, पण त्याने 1, 0, 0 आणि 14 रन केले. 4 मॅचमध्ये 31 बॉलचा सामना करून राहुलला 15 रनच करता आले.
सीरिजच्या चौथ्या मॅचमध्ये इशान किशनला (Ishan Kishan) दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी देण्यात आली. सूर्यकुमारनेही या संधीचं सोनं करत अर्धशतकी खेळी केली. तर सीरिजच्या दुसऱ्या आणि आपल्या पदार्पणाच्या मॅचमध्ये इशान किशनने अर्धशतक केलं होतं. आता इशान किशन शेवटच्या मॅचसाठी पुन्हा फिट झाला, तर विराट कोणाला बाहेर बसवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विराट आणि बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathod) यांनी केएल राहुल भारतीय टीमचा महत्त्वाचा भाग असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे.
भारताची खराब ओपनिंग
सध्याच्या सीरिजमध्ये टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीची कामगिरी निराशाजनक राहिली. पहिल्या मॅचमध्ये शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि केएल राहुल यांना 2 रनची पार्टनरशीप करता आली. यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये धवनऐवजी इशान किशनला संधी मिळाली, पण या दोघांना एकही रन जोडता आली नाही. शेवटच्या दोन टी-20 मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल ओपनिंगला खेळले. यात दोघांनी 7 रन आणि 21 रनची पार्टनरशीप केली. म्हणजेच संपूर्ण सीरिजमध्ये भारताच्या ओपनिंग जोडीला फक्त 30 रनच करता आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, Kl rahul, Virat kohli