मॅनचेस्टर, 10 सप्टेंबर : भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी आणि अखेरची टेस्ट (India vs England 5th Test) कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे रद्द करण्यात आली आहे. चौथ्या टेस्टदरम्यान टीमचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri), बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) आणि फिल्डिंग कोच आर.श्रीधर (R Sridhar) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. यानंतर पाचव्या टेस्टच्या एक दिवस आधी टीमचे फिजियो योगेश परमार (Yogesh Parmar) यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं, यानंतर भारतीय खेळाडूंचा सराव रद्द करण्यात आला.
योगेश परमार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खेळाडूंनाही हॉटेलमध्येच क्वारंटाईन व्हायला सांगण्यात आलं. तसंच पुढच्या सूचना मिळेपर्यंत कोणीही रुममध्ये पडू नये, असे आदेशही देण्यात आले. यानंतर खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात आली, यात सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.
टीम इंडियाच्या खेळाडूंचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर टेस्ट मॅच खेळवली जाईल, असं सांगण्यात आलं. पण टॉसच्या दोन तासआधीच टेस्ट मॅच रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. याबाबत टीम इंडियाला व्हॉट्सऍप ग्रुपवर (WhatsApp Group) प्रत्येक अपडेट देण्यात येत होती.
क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय खेळाडूंना सुरुवातीला हॉटेल रुममध्येच राहा, असं व्हॉट्सऍप ग्रुपवर सांगण्यात आलं. यानंतर 10 मिनिटांनी मॅच रद्द झाल्याचं सांगितलं गेलं. काही वेळाने पुन्हा एकदा ग्रुपवर मेसेज आला, ज्यात रुममध्ये नाश्त्याची व्यवस्था होऊ शकत नाही, त्यामुळे खेळाडू खाण्यासाठी हॉटेलच्या बाहेर जाऊ शकतात, असं सांगण्यात आलं.
भारताने ओव्हलमध्ये झालेली चौथी टेस्ट 157 रनने जिंकली होती आणि सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी मिळवली होती. आता सीरिजची पाचवी टेस्ट दोन्ही बोर्डांच्या सहमतीने भविष्यात खेळवली जाणार आहे. ती मॅच या टेस्ट सीरिजचा भाग नसेल, त्यामुळे या सीरिजचा निकाल काय लागला, याबाबत आयसीसी निर्णय घेईल, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या सीईओंनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Team india