मेलबर्न, 21 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) 8 विकेटने दारूण पराभव झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा फक्त 36 रनवर ऑल आऊट झाला. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा सगळ्यात कमी स्कोअर होता. या पराभवानंतर भारतीय टीमही धक्क्यात आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतण्याआधी खेळाडूंसोबत बैठक घेणार आहे. या बैठकीत विराट खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.
विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला बाळाला जन्म देणार आहे, त्यामुळे विराट ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून भारतात परतणार आहे. मंगळवारी विराट कोहली भारतात येण्यासाठी निघणार आहे. विराटच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणे टीमचं नेतृत्व करेल.
भारतात परतण्याआधी विराट कोहली सर्व खेळाडूंसोबत एकत्र आणि मग प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या संवाद साधणार आहे. ज्यामुळे बॉक्सिंग डे टेस्ट आधी खेळाडूंना पुन्हा एकदा विश्वास आणि प्रोस्ताहन मिळेल. इनसाईड स्पोर्ट्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
व्हॉट्सऍपवरून विराट टीमसोबत
अजिंक्य रहाणेने दोनवेळा भारताच्या टेस्ट टीमचं नेतृत्व केलं आहे. एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानात आणि अफगाणिस्तानविरुद्ध रहाणे टीम इंडियाचा कर्णधार होता. या दोन्ही मॅचमध्ये भारताचा विजय झाला होता, पण आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. भारतात परतण्याआधी विराट प्रत्येक खेळाडूशी बातचित करून त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सांगणार आहे. भारतात परतला तरी विराट व्हॉट्सऍपच्या माध्यमातून संपूर्ण टीमशी जोडलेला राहणार आहे.