मेलबर्न, 26 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टसाठी भारताने (India vs Australia) टीममध्ये चार बदल केले. शुभमन गिल, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे. पृथ्वी शॉ आणि ऋद्धीमान साहा यांना डच्चू देण्यात आला. तर विराट पितृत्वाच्या रजेवर गेल्यामुळे आणि मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यामुळे या सीरिजमध्ये खेळणार नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने टीमच्या या निवडीवर निशाणा साधला आहे. भारतीय टीम खेळाडूंमध्ये असुरक्षितता निर्माण करत आहे, असं गंभीर म्हणाला आहे.
'ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) च्या बदली ऋषभ पंत (Rishabh Pant) ला घेणं हे दोन्ही विकेट कीपरसाठी अनुचित आहे. साहा याला एक टेस्ट मॅच खेळवली आणि त्यानंतर त्याला बाहेर करण्यात आलं, हे दूर्दैवी आहे. जर पंत दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टमध्ये अपयशी ठरला तर तुम्ही काय करणार? मग पुन्हा साहा टीममध्ये येणार? खेळाडूंना बोलल्यामुळे नाही, तर तुम्ही काय करता त्यामुळे सुरक्षित वाटतं. सध्याच्या टीमला हे करता आलेलं नाही, त्यामुळे टीम अस्थिर वाटत आहे. कोणताही खेळाडूमध्ये सुरक्षित असल्याचा भाव नाही. खेळाडूच्या मनात आपलं स्थान सुरक्षित असणं महत्त्वाचं असतं. देशासाठी खेळणारा प्रत्येक खेळाडू प्रतिभावान असतो,' अशी प्रतिक्रिया गंभीरने स्पोर्ट्स टुडेशी बोलताना दिली.
'खेळाडूला सुरक्षा आणि आश्वासनाची गरज असते. वेळ आली तर टीम प्रशासनाने आपली साथ द्यावी, असं खेळाडूला वाटत असतं. भारताशिवाय कोणतीही टीम विकेट कीपर बदलत नाही. पंत आणि साहा या दोघांवर बराच काळ अन्याय झाला आहे. परिस्थितीनुसार त्यांची निवड केली जाते, पण विकेट कीपरसोबत असं केलं जात नाही, तर बॉलरसोबत केलं जातं,' असं वक्तव्य गंभीरने केलं.