मेलबर्न, 27 डिसेंबर : मेलबर्न टेस्टचा दुसरा दिवस टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने गाजवला आहे. बॉक्सिंग डे टेस्टमध्ये रहाणेने धमाकेदार शतक केलं आहे. अजिंक्य रहाणेचं हे टेस्ट क्रिकेटमधलं 12वं शतक आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 277-5 एवढा झाला आहे, त्यामुळे भारताची आघाडी 82 रन झाली आहे. अजिंक्य रहाणे 104 रनवर आणि रविंद्र जडेजा 40 रनवर नाबाद खेळत आहेत. रहाणे आणि जडेजा यांच्यामध्ये नाबाद 104 रनची पार्टनरशीप झाली आहे. रहाणेने पहिले हनुमा विहारी, ऋषभ पंत यांच्यासोबत प्रत्येकी 50-50 रनची पार्टनरशीप केली. ज्यामुळे भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
अजिंक्य रहाणेचं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरचं हे दुसरं शतक आहे. या मैदानात दोन शतकं करणारा विनू मंकड यांच्यानंतर रहाणे दुसरा भारतीय खेळाडू आहे. तर मोहम्मद अजहरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यानंतर ऑस्ट्रेलियात शतक करणारा रहाणे पाचवा कर्णधार आहे.
दुसऱ्या सत्रात भारताने हनुमा विहारीला 21 रनवर आणि ऋषभ पंतला 29 रनवर गमावलं. विहारीला लायनने आणि पंतला स्टार्कने आऊट केलं.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रामध्ये भारताला (India vs Australia) दोन धक्के लागले. दिवसाच्या सुरूवातीलाच भारताने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) यांना गमावलं. चेतेश्वर पुजारा 17 रन करून तर शुभमन गिल 45 रन करून माघारी परतला. या दोघांना पॅट कमिन्सने (Pat Cummins) माघारी पाठवलं. दुसऱ्या दिवसाचा लंच झाला तेव्हा भारताचा स्कोअर 90-3 एवढा झाला आहे. अजूनही भारतीय टीम 105 रनने पिछाडीवर आहे. दिवसाची सुरूवात भारताने 36-1 अशी केली होती.
त्याआधी काल भारताने मयंक अगरवालच्या (Mayank Agarwal) रुपात पहिली विकेट गमावली होती. मयंक शून्य रन करून आऊट झाला होता. पहिल्या दिवशी टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारताने 195 रनवर रोखलं. बुमराहने 4 विकेट घेतल्या, तर अश्विनला 3, मोहम्मद सिराजला 2 आणि रविंद्र जडेजाला 1 विकेट मिळाली.
पहिल्या टेस्टमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर या टेस्ट मॅचमध्ये पुनरागमन करण्याचं मोठं आव्हान भारतीय टीमपुढे आहे. पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा 36 रनवर ऑल आऊट झाला होता. भारताचा टेस्ट क्रिकेटमधला हा निचांकी स्कोअर होता.