मेलबर्न, 31 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs Australia) 8 विकेटने दणदणीत विजय मिळवला. याचसोबत भारताने 4 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. आता सीरिजची तिसरी टेस्ट सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या टेस्टआधी भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पुढे अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.
रोहित शर्मा टीममध्ये दाखल
दिग्गज खेळाडू आणि ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) तिसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये दाखल झाला आहे. पण रोहित शर्माला कोणाच्या जागी खेळवायचं, हा प्रश्न आहे. मयंक अगरवाल (Mayank Agarwal) ला सीरिजच्या दोन्ही मॅचमध्ये मोठी धावसंख्या करता आली नाही. तसंच हनुमा विहारी (Hanuma Vihari) यालाही संघर्ष करावा लागला आहे.
भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे. 'मयंक आणि हनुमा विहारीला बाहेर ठेवणं कठीण निर्णय असेल. रोहित बऱ्याच कालावधीनंतर खेळणार आहे, त्यामुळे त्याला ओपनिंगला खेळायचं आहे का मधल्या फळीत हेदेखील पाहावं लागेल. मयंक अगरवालने मागच्या 18 महिन्यात शतक आणि द्विशतक केलं आहे, त्यामुळे मयंकला बाहेर ठेवणं कठीण निर्णय ठरेल', असं प्रसाद म्हणले आहे.
गिलची शानदार कामगिरी
आपल्या पदार्पणाची मॅच खेळणाऱ्या शुभमन गिल (Shubhaman Gill) याने दुसऱ्या टेस्टमध्ये शानदार कामगिरी केली. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला पहिल्या टेस्टमध्ये संघर्ष करावा लागल्यामुळे शुभमन गिलला टीममध्ये संधी मिळाली, या संधीचं त्याने सोनं केलं.
केएल राहुल बेंचवर
फॉर्ममध्ये असलेला केएल राहुल (KL Rahul) देखील अजून बेंचवरच बसला आहे, त्यामुळे राहुलबद्दलचा निर्णयही रहाणेला घ्यावा लागणार आहे.
उमेश यादवला दुखापत
दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगदरम्यान उमेश यादव (Umesh Yadav)च्या पोटरीला दुखापत झाली, त्यामुळे तो उरलेल्या टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला आहे. उमेश यादवच्या बदली भारतापुढे टी.नटराजन, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर हे तीन पर्याय उपलब्ध आहेत.