ब्रिस्बेन, 19 जानेवारी : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये (India vs Australia) पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. ब्रिस्बेन टेस्टमध्ये भारताने रोमांचक विजय मिळवला आहे ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 328 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने अगदी शेवटच्या क्षणी पूर्ण केला. ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) यांची आक्रमक खेळी आणि चेतेश्वर पुजाराचं संयमी अर्धशतक भारताच्या विजयात मोलाचं ठरलं. पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारताला विजयासाठी 37 ओव्हरमध्ये 145 रनची गरज होती. दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये भारताने शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ची विकेट गमावली. शुभमन गिल 91 रनवर तर अजिंक्य रहाणे 24 रन करून आऊट झाला. चेतेश्वर पुजारा 56 रनवर तर मयंक अगरवाल 9 रन करून माघारी परतला.
पाचव्या दिवसाची सुरूवात भारताने 4/0 अशी केली होती, पण दिवसाच्या सुरूवातीलाच रोहित शर्मा (Rohit Sharma) आऊट झाला. पॅट कमिन्सने रोहितला माघारी धाडलं. यानंतर गिल आणि पुजाराने भारताला सावरलं.
लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा
दरम्यान 33 रनची आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅचच्या चौथ्या दिवशी 294 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे भारताला विजयासाठी 328 रनचं आव्हान मिळालं.
सीरिजमधल्या पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीमने धमाकेदार पुनरागमन करत विजय मिळवला, यानंतर तिसऱ्या टेस्टमध्येही पराभव होईल, असं वाटत असताना दुखापतींचा सामना करत विहारी आणि अश्विन शेवटच्या दिवशी मैदानात टिकून राहिले, ज्यामुळे मॅच ड्रॉ झाली होती.