मुंबई, 24 जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाने (India vs Australia) धमाकेदार कामगिरी करत टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवला. ऍडलेड टेस्टमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारताने मेलबर्नमध्ये जोरदार पुनरागमन करत सामना जिंकला. यानंतर सिडनी टेस्टमध्ये हरलेल्या मॅचमध्ये शेवटपर्यंत संघर्ष करता मॅच ड्रॉ केली, तर ब्रिस्बेनमध्ये अशक्य वाटणारा विजय मिळवला आणि बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) 2-1 च्या फरकाने जिंकली.
टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ने या विजयानंतर सगळ्या खेळाडूंचे आभार मानले. या विजयाचं श्रेय रहाणेने संपूर्ण टीमला दिलं. एवढच नाही, तर त्याने ज्या दोन खेळाडूंना संधी मिळाली नाही, त्यांचाही आत्मविश्वास वाढवला. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला अजिंक्य रहाणेने भविष्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे.
ब्रिस्बेन टेस्टनंतर रहाणेने ड्रेसिंग रूममध्ये टीमसोबत संवाद साधला. 'हा माझ्यासाठी खूप मोठा क्षण आहे. ऍडलेडमध्ये जे झालं, त्यानंतर आपण मेलबर्नमध्ये पुनरागमन केलं, ते खूपच शानदार होतं. हा फक्त एक-दोन खेळाडूंचा प्रयत्न नव्हता, तर संपूर्ण टीमचा होता. या तिन्ही मॅचमध्ये प्रत्येकाने योगदान दिलं,' असं रहाणे म्हणाला.
रहाणेने ड्रेसिंग रूममध्ये कुलदीप यादव आणि कार्तिक त्यागीचाही आत्मविश्वास वाढवला. 'मला माहिती आहे की तुमच्यासाठी या गोष्टी खूप कठीण आहेत, कारण तुम्हाला एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही, पण तुमचे विचार खरंच चांगले आहेत. तुमचीही वेळ येईल, अशीच मेहनत करत राहा,' असं वक्तव्य रहाणेने केलं.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता इंग्लंडविरुद्धच्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे. या सीरिजमध्ये कुलदीप यादवला खेळायची संधी मिळू शकते. भारताचे बॉलिंग प्रशिक्षक भरत अरूण यांनीही याबाबतचे संकेत दिले आहेत.