पार्ल, 21 जानेवारी : भारतीय क्रिकेटमध्ये आलेल्या वादळाचा परिणाम मैदानातल्या निकालांवरही लागत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा (India vs South Africa) टेस्ट सीरिजनंतर आता वनडे सीरिजमध्येही पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दोन्ही वनडेमध्ये अगदी सहज विजय मिळवला. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियामध्ये आत्मविश्वासाचा अभाव जाणवत होता, तसंच टीमची बॉडी लॅन्ग्वेजही सगळं काही सांगून जात होती. 2021 च्या इंग्लंड दौऱ्यापर्यंत क्रिकेटवर राज्य करणाऱ्या भारतीय क्रिकेटमध्ये मागच्या 6 महिन्यांमध्ये असं काय झालं? या सगळ्याला जबाबदार कोण? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
विराट कोहली
या सगळ्या वादाला सुरूवात झाली ती विराटच्या (Virat Kohli) कॅप्टन्सीमुळे. टी-20 वर्ल्ड कपआधीच विराटने आपण स्पर्धेनंतर कॅप्टन्सी सोडणार असल्याचं सांगितलं. यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरूनही हटवण्यात आलं. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजनंतर विराटने अचानक टेस्ट टीमची कॅप्टन्सीही सोडली. विराटच्या या निर्णयाचा टीमलाही धक्का लागला, ज्याचा फटका त्यांना मैदानात बसला.
सौरव गांगुली
विराट कोहलीच्या कॅप्टन्सीच्या वादात बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीचं (Sourav Ganguly) नावही पुढे आलं. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नको, असं सांगण्यात आलं होतं, पण तो ऐकला नाही. निवड समितीला मर्यादित ओव्हरसाठी एकच कर्णधार हवा होता, त्यामुळे त्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं. विराटने मात्र दादाचा हा दावा फेटाळून लावला. टी-20 कॅप्टन्सी सोडू नकोस, असं मला सांगण्यात आलं नसल्याचं विराट म्हणाला. विराटच्या या वक्तव्यानंतर गांगुली संतापला आणि त्याने विराटला नोटिस पाठवण्याची तयारी केली, पण बीसीसीआयच्या इतर अधिकाऱ्यांनी गांगुलीला हे करण्यापासून रोखलं, असं वृत्तही प्रसिद्ध झालं. विराट आणि गांगुली यांच्यातल्या या वादात टीमचं मात्र मोठं नुकसान होतंय.
राहुल द्रविड
एकीकडे विराट आणि सौरव गांगुलीचा वाद सुरू असताना राहुल द्रविड (Rahul Dravid) टीममध्ये प्रशिक्षक म्हणून आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटसाठी द्रविडची भूमिका महत्त्वाची ठरते. विराट-गांगुलीचा वाद मिटवण्याचा प्रयत्न द्रविडने केला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केएल राहुल
भारतीय क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या या वादाच्या पार्श्वभूमीवरच केएल राहुलला (KL Rahul) कॅप्टन्सी मिळाली. टेस्ट सीरिजच्या दुसऱ्या टेस्टआधी विराटला दुखापत झाल्यामुळे राहुलला ही जबाबदारी मिळाली. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये राहुलला पराभव स्वीकारावा लागला. यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये विराटचं कर्णधार म्हणून पुनरागमन झालं. विराटला वनडे सीरिजच्या कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर रोहित शर्माला ही जबाबदारी देण्यात आली. पण रोहितला दुखापत झाल्यामुळे केएल राहुलला वनडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं. भारतीय टीममध्ये एवढे वाद सुरू असताना कर्णधार म्हणून राहुलला टीमचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज होती, पण यात तो अपयशी ठरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Kl rahul, Rahul dravid, Sourav ganguly, Team india, Virat kohli