केपटाऊन, 14 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa 3rd Test) 7 विकेटने पराभव झाला. याचसोबत दक्षिण आफ्रिकेने 3 टेस्ट मॅचची ही सीरिज 2-1 ने गमावली. भारताला अजूनपर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा मोठा विजय झाला, यानंतर यंदा भारतीय टीम इतिहास घडवेल, असं वाटत होतं, पण टीम इंडियाचं स्वप्न यावेळीही अधूरंच राहिलं. या पराभवानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) आपण कुठे कमी पडलो, याची कारणं सांगितली आहेत.
'पहिल्या टेस्टमध्ये आम्ही चांगलं खेळलो, पण दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन केलं आणि तिसऱ्या टेस्टमध्ये त्यांनी तोच आत्मविश्वास पुढे नेला. महत्त्वाच्या क्षणी आमचं लक्ष विचलित झालं, त्याच महत्त्वाच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेने चांगली कामगिरी केली, त्यामुळे ते विजयासाठी लायक होते,' असं विराट म्हणाला.
'35-40 मिनिटांच्या खराब बॅटिंगमुळे आम्ही सामने गमावले. दक्षिण आफ्रिकेने चांगली बॉलिंग केली, पण आम्ही सातत्य दाखवलं नाही. खूपवेळा आमची बॅटिंग गडगडली. आमच्यासाठी बॅटिंग हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. याबाबत आम्हाला नक्कीच विचार करावा लागणार आहे,' असं वक्तव्य विराटने केलं.
'आम्ही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली म्हणजे दक्षिण आफ्रिकेतही आम्हाला यश मिळेल असं नाही. आम्ही दक्षिण आफ्रिकेत जिंकू शकलो नाही, हे सत्य आहे. केएल आणि मयंकची ओपनिंग आणि ऋषभ पंतचं शतक या गोष्टी आमच्यासाठी सकारात्मक आहेत. सेंच्युरियनमधला विजयही स्पेशल आहे,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South africa, Team india, Virat kohli