केपटाऊन, 14 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याचं टीम इंडियाचं (India vs South Africa) स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. केपटाऊनमधल्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताने दिलेल्या 212 रनच्या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने अगदी सहज केला आहे. भारताने दिलेलं हे आव्हान आफ्रिकेने 7 विकेट राखून पूर्ण केलं. टेम्बा बऊमा 32 रनवर नाबाद तर रस्सी व्हॅन डर डुसेन 41 रनवर नाबाद राहिले. आफ्रिकेकडून पीटरसनने सर्वाधिक 82 रन केले.
मॅचच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी आणखी 111 रनची गरज होती, त्यामुळे टीम इंडियाच्या बॉलर्सना सुरुवातीलाच आफ्रिकेच्या विकेट घेणं गरजेचं होतं, पण यात त्यांना यश आलं नाही. मागच्या काही काळापासून टीम इंडियाची बॅटिंग अपयशी ठरत होती, पण या सीरिजच्या अखेरच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या बॉलर्सनाही निराशा आली. जोहान्सबर्गनंतर केपटाऊनमध्येही भारतीय बॉलर्सना अखेरच्या इनिंगमध्ये 200 पेक्षा जास्तचा स्कोअर असूनही दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगला रोखता आलं नाही.
सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला, यानंतर टीमचा आत्मविश्वास दुणावला होता. पण जोहान्सबर्ग टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने धमाकेदार पुनरागमन करत सीरिजमध्ये बरोबरी साधली आणि आता केपटाऊन टेस्ट जिंकून सीरिजमध्येही विजय मिळवला.
केपटाऊन टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये टॉस जिंकून बॅटिंग घेतल्यानंतर भारताचा 223 रनवर ऑलआऊट झाला. यानंतर भारतीय बॉलर्सनी आफ्रिकेला 210 रनवर रोखलं आणि टीमला 12 रनची आघाडी मिळाली. दुसऱ्या इनिंगमध्ये ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर भारताने 198 रन केले आणि दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 रनचं आव्हान मिळालं.
भारताला अजूनपर्यंत एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नव्हती. यावेळी पहिली टेस्ट जिंकल्यानंतर टीमकडून इतिहास घडवण्याच्या अपेक्षा वाढल्या होत्या, पण भारताचं हे स्वप्न यंदाही अधूरंच राहिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South africa, Team india