जोहान्सबर्ग, 3 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या दुसऱ्या टेस्टला (India vs South Africa 2nd Test) जोहान्सबर्गमध्ये सुरुवात झाली आहे, पण या मॅचआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार विराट कोहलीशिवायच (Virat Kohli) भारतीय टीम मैदानात उतरली आहे. विराटऐवजी केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाचा कर्णधार आहे. विराटला पाठदुखीचा त्रास होत असल्यामुळे तो या टेस्टमध्ये खेळत नसल्याचं केएल राहुलने टॉसवेळी सांगितलं. राहुलने हे कारण सांगितलं असलं, तरी विराटच्या या दुखापतीबाबत टीम इंडियाला माहिती नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचं कारण आहे 24 तासांपूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) घेतलेली पत्रकार परिषद.
जोहान्सबर्ग टेस्टआधी रविवारी राहुल द्रविड पत्रकार परिषद घेण्यासाठी आला. वनडे कॅप्टन्सीवरून केलेल्या वक्तव्यावरून वाद झाल्यानंतर विराट पत्रकार परिषदेला आला नाही. पहिल्या टेस्टआधीही द्रविडच पत्रकार परिषदेला सामोरा गेला. यानंतर रविवारी द्रविडला विराट पत्रकार परिषदेसाठी कधी येणार? असा सवाल द्रविडला विचारण्यात आला. त्यावेळी विराट त्याची 100 वी टेस्ट म्हणजेच तिसऱ्या टेस्टवेळी येईल, असं मला सांगण्यात आल्याचं उत्तर द्रविडने दिलं.
विराट कोहलीने आतापर्यंत 98 टेस्ट खेळल्या आहेत. या दौऱ्यातली तिसरी टेस्ट विराटची 100 वी टेस्ट असती. राहुल द्रविडनेही त्याच्या पत्रकार परिषदेमध्ये हेच सांगितलं, त्यामुळे 24 तास आधी विराट पहिली टेस्ट खेळणार हे निश्चित होतं, पण अचानक सुरू झालेल्या पाठदुखीच्या त्रासामुळे विराटने माघार घेतली.
विराट वादात
दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी विराट कोहलीला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं. टी-20 टीमची कॅप्टन्सी विराटने आधीच सोडली होती. विराटला कॅप्टन्सी न सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता, पण तो ऐकला नाही. निवड समितीला वनडे आणि टी-20 साठी एकच कर्णधार हवा होता, त्यामुळे विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याचं बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सांगितलं. गांगुलीचा हा दावा विराट कोहलीने खोडून काढला. टी-20 टीमची कॅप्टन्सी न सोडण्याबाबत मला सांगण्यात आलं नाही, तसंच टेस्ट टीमची निवड करण्याआधी मला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरूनही हटवल्याचं सांगण्यात आलं, असं विराट दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला.
कर्णधारानेच बीसीसीआय अध्यक्षाचा दावा खोटा ठरवल्यामुळे विराट आणि गांगुलीमधला वाद समोर आला. अखेर गांगुलीने समोर येऊन, माझ्यासाठी हे प्रकरण संपलं आहे. या गोष्टीमध्ये आता बीसीसीआय लक्ष घालेल, अशी प्रतिक्रिया देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul dravid, South africa, Team india, Virat kohli