सेंच्युरियन, 28 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 1st Test) यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या दुसरा दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. पावसामुळे खेळ रद्द दक्षिण आफ्रिकेच्या पथ्यावर पडलं, कारण पहिल्या दिवशी टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली होती. आता मॅचचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी टीम इंडियाला चमत्कार करावा लागणार आहे. दुसऱ्या दिवशी पावसाने खेळ केला असला तरी तिसऱ्या दिवशी मात्र संपूर्ण खेळ व्हायची शक्यता आहे, कारण हवामान खात्याने पाऊस पडणार नाही असा अंदाज वर्तवला आहे. दुसरा दिवस पावसाने फुकट गेला असल्यामुळे आता उरलेले तिन्ही दिवस 98 ओव्हरचा खेळ होणार आहे.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने दिवसाअखेर 272/3 एवढा स्कोअर केला. केएल राहुल (KL Rahul) 122 रनवर तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 40 रनवर नाबाद खेळत आहेत. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) या दोन्ही ओपनरनी भारताला 117 रनची सुरूवात करून दिली, पण मयंक 60 रनवर आऊट झाला. यानंतर लगेचच पुढच्याच बॉलला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) शून्य रनवर माघारी परतला. लागोपाठ दोन विकेट गेल्यानंतर राहुल आणि विराटने भारताचा डाव सावरायला सुरुवात केली. पण ऑफ स्टम्पच्या बाहेरचा बॉल मारण्याच्या नादात विराट 35 रनवर आऊट झाला. विराटची विकेट गेल्यानंतर राहुलने पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेसोबत पार्टनरशीप केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने (Lungi Ngidi) सगळ्या 3 विकेट घेतल्या.