कानपूर, 22 नोव्हेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये (India vs New Zealand T20 Series) 3-0 ने विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया 2 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी (Test Series) कानपूरला रवाना झाली आहे. 25 नोव्हेंबरपासून पहिल्या टेस्टला सुरुवात होणार आहे. टी-20 टीमचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) टेस्ट सीरिजमधून विश्रांती देण्यात आली आहे, तर विराट कोहलीही (Virat Kohli) पहिली टेस्ट खेळणार नाही, त्यामुळे अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. अजिंक्य रहाणेसाठी ही सीरिज अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण इंग्लंड दौऱ्यामध्ये रहाणेची कामगिरी निराशाजनक झाली होती, यानंतर त्याला टीममधून बाहेर करण्याची मागणीही जोर धरू लागली होती, पण तरीही न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी रहाणेची निवड झाली. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) यानेही रहाणेवर निशाणा साधला आहे.
'रहाणेचं नशीब चांगलं म्हणून तो अजूनही टीममध्ये आहे. टीकाकारांना प्रत्युत्तर देण्याची आणखी एक संधी त्याला मिळाली आहे. मयंक अग्रवाल आणि केएल राहुल ओपनिंगला खेळले पाहिजेत. शुभमन गिलला चौथ्या क्रमांकावर संधी मिळाली पाहिजे,' असं गंभीर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला.
मागच्या दोन वर्षांमध्ये रहाणेच्या कामगिरीमध्ये सातत्याचा अभाव राहिला आहे. 2019 पासून रहाणेने 40 टेस्टमध्ये 7 अर्धशतकं आणि 3 शतकं केली आहेत. वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक टेस्ट सीरिज विजय मिळवला, त्या टीमचा रहाणे कर्णधार होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न टेस्टमध्ये रहाणेने शतक केलं होतं, यानंतर त्याला मोठा स्कोअर करता आला नाही. यानंतर इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर आली तेव्हा रहाणेने 4 टेस्टमध्ये 112 रन केल्या. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यातही रहाणेला संघर्ष करावा लागला. लॉर्ड्स टेस्टमध्ये अर्धशतकी खेळी केल्यानंतर रहाणेला 20 रनपेक्षा जास्तचा स्कोअर एकदाही करता आला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane, New zealand, Team india