कानपूर, 29 नोव्हेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पाचव्या दिवशी (India vs New Zealand 1st Test) भारतीय बॉलर्सना 10 विकेट घेण्यात अपयश आलं, त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला. मॅच संपल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) खेळाडूंचं कौतुक केलं आणि आम्ही मॅच जिंकण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला, असं म्हणाला. मुंबईत जन्मलेला एजाझ पटेल (Ajaz Patel) आणि कर्नाटकमध्ये जन्मलेल्या रचिन रविंद्र (Rachin Ravindra) यांनी अखेरच्या विकेटसाठी 8.4 ओव्हर बॅटिंग केली, ज्यामुळे सामन्याचा निकाल लागला नाही. सीरिजची अखेरची टेस्ट 3 डिसेंबरला मुंबईमध्ये खेळवला जाणार आहे.
अजिंक्य रहाणे मागच्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. रहाणेने या टेस्टमधून पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरचं (Shreyas Iyer) कौतुक केलं. श्रेयस अय्यरने पहिल्या इनिंगमध्ये शतक आणि दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक केलं. दुसऱ्या टेस्टमधून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुनरागमन करणार आहे, त्यामुळे टीममध्ये काय बदल होणार, असा प्रश्न रहाणेला विचारण्यात आला. तेव्हा 'मी अय्यरसाठी खूश आहे, त्याला पदार्पण करण्यासाठी खूप वाट पाहावी लागली. त्याचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं रेकॉर्डही चांगलं आहे. विराट पुढच्या मॅचला पुनरागमन करत आहे, पण 11 खेळाडूंमध्ये कोणाला संधी मिळेल, याचा निर्णय टीम मॅनेजमेंट घेईल,' असं रहाणेने सांगितलं.
'क्रिकेटचा हा चांगला मुकाबला झाला, न्यूझीलंडने चांगला खेळ केला. पहिल्या सत्रानंतर आम्ही पुनरागमन केलं. आम्ही यापेक्षा वेगळं काही करू शकलो असतो, असं मला वाटत नाही,' अशी प्रतिक्रिया रहाणेने दिली. चौथ्या दिवशी उशिरा डाव घोषित केला का? असंही रहाणेला विचारण्यात आलं, पण त्याने हा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने त्याच्या टीमच्या तळाच्या खेळाडूंचं कौतुक केलं, यामध्ये नाईट वॉचमन विलियम समरविल याचाही समावेश आहे. समरविलने 125 मिनिटं बॅटिंग करत 36 रन केले. तर 9 विकेट गेल्यानंतर एजाझ पटेल आणि रचिन रविंद्र यांनी 52 बॉल खेळून काढले आणि भारताच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane, Team india, Virat kohli