लखनऊ, 29 जानेवारी : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने अखेरच्या षटकात 6 विकेटने विजय मिळवला. अवघ्या 100 धावांचे आव्हान पार करताना भारतीय फलंदाजांची दमछाक झाली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 99 धावा केल्या होत्या. तर भारताने हे आव्हान 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारताच्या 14.3 षटकात 4 बाद 70 धावा झाल्या होत्या. त्यानतंर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी संयमी खेळी करत भारताला विजयाच्या जवळ नेले. दोघांनी 31 धावांची भागिदारी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. सूर्यकुमार यादवने चौकार मारत विजय मिळवून दिला.
हेही वाचा : 19व्या वर्षीच शेफालीचा 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीसारखा चमत्कार; रचला इतिहास
नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझींलडची सुरुवात चांगली झाली होती. संघाच्या 3.2 षटकात 21 धावा झाल्या असताना युझवेंद्र चहलने फिन एलनला बाद केलं. त्यानतंर पुढच्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने कॉनवेला बाद करून न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. अर्शदीप सिंगने दोन गडी बाद केले तर हार्दिक पांड्या, दीपक हुड्डा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. न्यूझीलंडकडून सँटनरने सर्वाधिक 19 धावा केल्या. तर ब्रेसवेल आणि चॅपमन यांनी प्रत्येकी 14 धावांची खेळी केली. दोन्ही संघाच्या खेळाडूंना एकही षटकार मारता आला नाही.
न्यूझीलंडने दिलेल्या 100 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताला चौथ्या षटकात ब्रेसवेलने पहिला धक्का दिला. शुभमन गिल 11 धावांवर बाद झाला. त्यानतंर इशान किशन नवव्या षटकात 19 धावांवर धावबाद झाला. तर राहुल त्रिपाठी फलंदाजीत पुन्हा अपयशी ठरला. त्याने 18 चेंडूत 13 धावा केल्या. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा वॉशिंग्टन सुंदर 10 धावांवर धावबाद झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket