कानपूर, 29 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली पहिली टेस्ट (India vs New Zealand 1st Test) रोमांचक पद्धतीने ड्रॉ झाली आहे. 5 दिवस चाललेल्या या टेस्टचा निकाल अखेरच्या बॉलवर लागला. भारताने दिलेल्या 284 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था 89.2 ओव्हरमध्ये 155/9 अशी झाली होती, पण रचिन रविंद्र (Rachin Ravindra) आणि एजाज पटेल (Ajaz Patel) यांनी पुढच्या 9 ओव्हर एकही विकेट न गमावता मैदानात झुंज दिली. शेवटची विकेट न मिळाल्यामुळे भारताचा या सामन्यात विजय होऊ शकला नाही.
दिवसाच्या 3 ओव्हर शिल्लक असतानाच मैदानामध्ये ढगाळ वातावरण झालं होतं, त्यामुळे सामना तेव्हाच थांबेल, असं वाटत होतं. पण जेव्हा अंपायरनी प्रकाश तपासण्यासाठी लाईट मीटर बाहेर काढले, तेव्हा अचानक सूर्य ढगांमधून बाहेर आला. कर्णधार अजिंक्य रहाणेनेही (Ajinkya Rahane) आता प्रकाश जास्त झालाय, असं वक्तव्य केलं. रहाणेचं हे वक्तव्य स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झालं. सूर्यप्रकाश आल्यामुळे टीम इंडियासाठी पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण झाला, पण निसर्गाने दिलेल्या या संधीचं टीम इंडियाला सोनं करता आलं नाही.
पाचव्या दिवसाची सुरुवात न्यूझीलंडने 4/1 अशी केली होती, पण नाईट वॉचमन असलेल्या विलियम सोमरविले याने टीम इंडियाला चांगलाच त्रास दिला. पहिल्या सत्रामध्ये टीम इंडियाला एकही विकेट मिळाली नाही. यानंतर दुसऱ्या सत्रात टीम इंडियाने तीन विकेट घेतल्या. सोमरविले, लॅथम आणि रॉस टेलर दुसऱ्या सत्रात पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर अखेरच्या सत्रात भारताला आणखी 6 विकेटची गरज होती, पण टीमला 5 विकेट घेण्यातच यश आलं.
भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर आर.अश्विनला 3 विकेट मिळाल्या. अक्षर पटेल आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. सीरिजची दुसरी टेस्ट 3 डिसेंबरपासून मुंबईमध्ये सुरू होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, Team india