नॉटिंघम, 3 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने मोठे दावे केले आहेत. नॉटिंघम टेस्टच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली आत्मविश्वासाने बोलत होता. टीम इंडियाची तयारी झाली आहे, बॅट्समन आणि बॉलर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत, असं विराट म्हणाला. तसंच अंडरसन आणि ब्रॉडबद्दलही तो बोलला आणि इंग्लंडच्या टीमला आम्ही अनेकवेळा ऑल आऊट करू, असा दावाही विराटने केला.
'सध्याची भारतीय टीम 2018 सालच्या टीमपेक्षा मजबूत आहे. मागच्या एक महिन्यापासून आम्ही इंग्लंडमध्ये आहोत. मानसिकदृष्ट्या आम्हाला चांगलं वाटत आहे. यावेळी जर काही खेळाडू अपयशी ठरले तर आमच्याकडे त्यांचा पर्याय आहे, जे कठीण परिस्थितीमध्ये टीमला वाचवू शकतात,' असं विराट म्हणाला.
विराट कोहलीने इंग्लंडच्या बॅट्समननाही इशारा दिला. 'आमची बॉलिंग मजबूत आहे. आमच्या टीममध्ये इंग्लंडला वारंवार ऑल आऊट करण्याची क्षमता आहे,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली. टीममध्ये मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांच्यासारखे फास्ट बॉलर आहेत.
टेस्ट सीरिजमध्ये भारतीय बॅट्समनसमोर सगळ्यात मोठं आव्हान जेम्स अंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचं असणार आहे. ब्रॉड अंडरसनच्या जोडीवर प्रश्न विचारला असता विराटने आम्ही प्रत्युत्तर देऊ असं सांगितलं. पहिल्या सामन्यासाठी विराटने 11 खेळाडूंची घोषणा केली नाही. टॉसनंतरच आपण खेळाडूंची नावं सांगू, असं विराट म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Virat kohli