नॉटिंघम, 8 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली आहे. पाचव्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी आणखी 157 रनची गरज होती, तसंच टीम इंडियाच्या हातात 9 विकेटही शिल्लक होत्या. पावसामुळे एकही बॉल खेळला गेला नाही, त्यामुळे टीम इंडियासोबत क्रिकेट चाहत्यांचीही निराशा झाली. नॉटिंघममध्ये पडलेल्या या पावसानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना 17 वर्षांपूर्वीच्या सामन्याची आठवण झाली.
2004 साली भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाने (India vs Australia) टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने ऐतिहासिक विजय मिळवला होता. या दौऱ्यातल्या चेन्नईमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टने (Chennai Test) टीम इंडियाचा घात केला. या मॅचमध्ये टीम इंडियाला विजयासाठी ऑस्ट्रेलियाने 229 रनचं आव्हान दिलं होतं. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 3 ओव्हरमध्ये 19 रन एवढा होता. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी आणखी 210 रनची गरज होती. वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग 7 रनवर नाबाद खेळत होते. तेव्हाही भारतीय क्रिकेट चाहत्यांना अखेरच्या दिवशी भारताचा विजय होईल याचा विश्वास होता, पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
2004 सालच्या सीरिजमध्ये चेन्नई टेस्टच्या आधी ऑस्ट्रेलिया 1-0 ने आघाडीवर होती. बंगळुरूमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये त्यांचा 217 रननी विजय झाला होता. चेन्नईची टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर नागपूरमध्ये झालेली तिसरी टेस्टही कांगारूंनी तब्बल 342 रनने जिंकली, त्यामुळे कांगारूंनी सीरिजमध्ये 2-0 ने विजयी आघाडी घेत इतिहास घडवला. मुंबईमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने रोमांचक विजय मिळवत 3-0 ने पराभवाची नामुष्की टाळली. अखेर ही सीरिज 2-1 ने ऑस्ट्रेलियाच्या खिशात गेली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs Australia, India vs england, Rain