मुंबई, 17 मार्च : हार्दिक पांड्याकडे पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. दरम्यान, नेतृत्व करत असताना त्याने केलेल्या वक्तव्यांनी याआधीही अनेकदा भुवया उंचावल्या आहेत. आपलं म्हणणं बेधडकपणे मांडणाऱ्या पांड्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्याआधीही असंच मोठं विधान केलं असून यावरून त्याचं कौतुकही केलं जात आहे.
पांड्याला विचारण्यात आलं होतं की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा विचार आहे का? या प्रश्नावर हार्दिक पांड्याने स्पष्ट शब्दात कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनाचा विचार नसल्याचं सांगितलं. तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी मी तयार नसल्याचंही तो म्हणाल.
हार्दिक पांड्याने अखेरचा कसोटी सामना २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध साउथम्पटनमध्ये खेळला होता. पांड्या म्हणाला की, कसोटी क्रिकेटमध्ये तोपर्यंत पुनरागमन करायचं नाहीय जोपर्यंत कसोटी संघात आपल्या खेळाच्या आणि कष्टाच्या जोरावर जागा मिळवू शकणार नाही. सध्या कसोटीत कोणाचीही जागा घेणं माझ्यासाठी नैतिक नाही असंही हार्दिक पांड्या म्हणाला.
एकाच नावाचे दोन गोलंदाज, धोनी अन् कपिल देव यांच्या कारकिर्दीत खेळले; माहितीय का?
मी कसोटी संघात पुनरागमनासाठी काही केलं नाही. त्यामुळे संघात मी स्वत:ला जागा असल्याचं मानत नाही. मी स्वत: नैतिक व्यक्ती आहे आणि कसोटी संघात जागा मिळवण्यासाठी १० टक्केसुद्धा कष्ट केलेलं नाही. अशा परिस्थितीत इतर कोणाची जागा अडवून संघात जाणं हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. जर मला कसोटी क्रिकेट खेळायचं असेल तर मी कठोर मेहनत करेन आणि स्थान मिळवेन. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप किंवा भविष्यातील कसोटी मालिकेसाठी मी तोपर्यंत उपलब्ध नसेल.
हार्दिक पांड्याने आतापर्यंत ११ कसोटी सामन्यात १ शतक आणि ४ अर्धशतकांसह ५३२ धावा केल्या आहेत. तसंच १७ विकेटही घेतल्या आहेत. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळताना हार्दिक पांड्याने असेही सांगितले की, रोहितच्या गैरहजेरीत शुभमन गिलसोबत इशान किशन डावाची सुरुवात करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket