साऊथम्पटन, 20 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या ऐतिहासिक फायनलमध्ये (WTC Final) निसर्ग अडथळा ठरत आहे. पहिल्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसामुळे वाया गेला. तर दुसऱ्या दिवशी खराब प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवावा लागला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाने 3 आऊट 146 रन केले आहेत. विराट कोहली (Virat Kohli) 44 रनवर आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 29 रनवर खेळत आहेत.
साऊथम्पटनमधील परिस्थितीचा विचार केला तर या पिचवर 250 रनचा स्कोअर देखील पुरेसा असेल असं भाकित टीम इंडियाचे बॅटींग कोच विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी केले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राठोड बोलत होते.
“आम्हाला प्रत्येक सेशनमध्ये चांगली बॅटींग करावी लागेल. आम्ही त्यामध्ये यशस्वी ठरलो तर या परिस्थितीमध्ये 250 रन देखील पुरेसे असतील. बॉल जुना झाल्यावर जास्त स्विंग होतो. न्यूझीलंडच्या बॉलर्लनी एकत्रितपणे चांगली कामगिरी केली आहे. त्याचवेळी या पिचवर रन देखील होत आहेत. हा खेळ असाच सुरू राहिल. बॉलर्सना नेहमी मदत मिळेल. त्यामुळे आम्हाला प्रत्येक सेशनचा विचार करुन बॅटींग केली पाहिजे.” असे राठोड यांनी सांगितले,
राठोड यांनी यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांची प्रशंसा केली. “विराट आणि अजिंक्यनं चांगली बॅटींग केली. पण मी रोहित आणि शुभमनला अधिक श्रेय देईल. त्यांनी कठिण परिस्थितीमध्ये संयम दाखवला. आम्ही दिवसाचा शेवट चांगला केला आहे. रोहित आणि शुभमन आक्रमक खेळ खेळू शकतात. त्यामुळे बॉलरवर दबाव कायम राहतो. दुर्दैवाने ते दोघंही एकत्र आऊट झाले. पण या दोघांपैकी एक जण मोठा स्कोअर करेल अशी मला खात्री आहे.”
रोहित-गिल जोडीनं संपवला 10 वर्षांचा दुष्काळ, फायनल टेस्टमध्ये केली कमाल
“चेतेश्वर पुजारानंही भक्कम बॅटींग केली. टीममध्ये त्याचा एक रोल आहे. त्याने 50 पेक्षा जास्त बॉल खेळले. त्याला आता या सुरुवातीचं चांगल्या स्कोअरमध्ये रुपांतर करण्याची गरज आहे. तो ते लवकरच करेल,” असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand, Team india