मुंबई, 31 मार्च : माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हा त्याच्या रोखठोक भूमिकेबद्दल प्रसिद्ध आहे. टीम इंडियामध्ये फिटनेसला दिल्या जाणाऱ्या अतिरेकी महत्त्वावर सेहवागनं नाराजी व्यक्त केली आहे. 'क्रिकेटमध्ये फिटनेस आवश्यक आहे, पण त्यापेक्षा खेळाडूंमधील टॅलेंट जास्त महत्त्वाचे आहे. एखाद्या खेळाडूची टीममध्ये निवड होण्याचा 'यो-यो' टेस्ट (yo-yo test) हा निकष चुकीचा आहे. ही टेस्ट यापूर्वी असती तर सचिन, लक्ष्मण आणि गांगुली कधीही पास झाले नसते,' असे मत सेहवागनं व्यक्त केले आहे.
काय म्हणाला सेहवाग?
'क्रिकबझ' शी बोलताना सेहवागने सांगितले की, 'अश्विन आणि चक्रवर्ती हे बहुतेक यो-यो टेस्टमध्ये पास न झाल्यानं खेळू शकत नाहीत. मला या गोष्टी मान्य नाहीत. निवडीचा हाच निकष असेल तर सचिन, लक्ष्मण आणि गांगुली कधीही पास झाले नसते. मी बीप टेस्टमध्ये या तीन दिग्गजांना कधीही पास झालेलं पाहिलं नाही. बीप टेस्टमध्ये 12.5 स्कोअर हा निकष होता. पण सचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांचा 10 किंवा 11 स्कोअर होत असे. असं असलं तरी या खेळाडूंचे कौशल्य चांगले होते.' असे सेहवागने सांगितले.
'माझ्या मते खेळाडूंचे कौशल्य जास्त महत्त्वाचे आहे. तुमची टीम फिट आहे आणि तुम्ही मॅचमध्ये हरत आहात कारण खेळाडूंमध्ये कौशल्यांची कमतरता आहे. तर हे चूक आहे. ज्या खेळाडूला खेळवायचे आहे त्याचे कौशल्य चांगले हवे. कारण अडचणीच्या परिस्थितीमध्ये तोच खेळाडू यशस्वी होईल. खेळांडूच्या फिटनेसमध्ये हळू-हळू सुधारणा होऊ शकते,' असे सेहवागने स्पष्ट केले.
( IPL 2021 : दिल्लीचा कर्णधार झाल्यानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला... )
माजी क्रिकेटपटू अजय जडेजानं देखील सेहवागच्या वक्तव्यावर सहमती दर्शवली. 'तुम्हाला शेफ हवा असेल तर तुम्ही त्याचे स्वयंपाकातील कौशल्य पाहाल. त्याची पहिल्यांदा रनिंग टेस्ट घेऊन तो त्यामध्ये पास होतो का? हे पाहणार नाही. माझ्या मते खेळाडूंचे कौशल्य हे त्यांच्या फिटनेसपेक्षा जास्त आवश्यक आहे,' असे जडेजानं यावेळी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Angry, BCCI, Cricket, Sachin tendulkar, Virender sehwag