मुंबई, 8 नोव्हेंबर: टीम इंडियासाठी (Team India) हा टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) निराशाजनक ठरला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जाणारी भारतीय टीमला यंदा सेमी फायनल गाठण्यातही अपयश आलं. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवाचा फटका त्यांना बसला. भारतीय क्रिकेट टीमच्या या कामगिरीवर वर्ल्ड कप विजेते माजी कॅप्टन कपिल देव (Kapil Dev) यांनी प्रश्न विचारला आहे. त्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंवर गंभीर आरोप केले असून बीसीसीआयकडं या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
कपिल देव यांनी 'एबीपी न्यूज'शी बोलताना टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीचं विश्लेषण केलं आहे. 'आता भविष्याकडं पाहण्याची वेळ आली आहे. एक वर्ल्ड कप संपला म्हणून देशातील पूर्ण क्रिकेट संपलेलं नाही. आता भविष्यातील प्लॅन बनवला पाहिजे. आयपीएल आणि वर्ल्ड कपमध्ये अंतर हवं होतं. सध्या आपल्या खेळाडूंना एक्स्पोजर खूप मिळत आहे, पण त्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा उठवता येत नाही.'
टीम इंडियावर आरोप
'काही खेळाडू देशाकडून खेळण्यापेक्षा आयपीएल स्पर्धेला प्राधान्य देत आहेत.' असा गंभीर आरोप कपिल देव यांनी केला ' बीसीसीआयनं हे प्रकरणा गांभीर्यानं घ्यायला हवं. मी फ्रँचायझी क्रिकेट खेळू नका असं म्हणत नाही. पण त्याचा एक क्रम हवा. तुमचं प्राधान्य काय आहे हे ठरायला हवं.' असंही कपिल यांनी स्पष्ट केलं.
T20 World Cup: BCCI चा मास्टर स्ट्रोक वाया, पहिल्या परीक्षेत धोनी फेल!
कपिल देव यांनी यावेळी पुढे सांगितलं की, 'खेळाडू देशापेक्षा आयपीएलला जास्त प्राथमिकता देत असतील तर आपण काय बोलणार? खेळाडूंना देशासाठी खेळण्याचा अभिमान हवा. मला त्यांची आर्थिक स्थिती माहिती नाही. त्यामुळे मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही. पण माझ्या मते देश प्रथम आणि नंतर फ्रँचायझी क्रिकेट हवं. आता बीसीसीआयनं योग्य नियोजन केलं पाहिजे,' अशी मागणी त्यांनी केली. या स्पर्धेत आपण ज्या चुका केल्या त्याची पुनरावृत्ती न करणे हाच आपला सर्वात मोठा धडा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup, Team india