मुंबई, 25 एप्रिल: टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची प्रशंसा केली आहे. शास्त्रींकडं तरुण खेळाडूंना योग्य दिशा देण्याचं आणि त्यांच्यात आत्मविश्वास देण्याची क्षमता आहे, असं प्रशस्तीपत्रक गावसकरांनी दिलं आहे. ' 1971 : द बिगनिंग ऑफ इंडियाज क्रिकेटिंग ग्रेटनेस' या पुस्तकाच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात गावसकर बोलत होते.
गावसकरांनी पुढे सांगितलं की, "शास्त्रींसोबत प्रॅक्टीस सेशनमध्ये 10 ते 15 मिनिटे घालवल्यानंतर तरुण खेळाडूंना आत्मविश्वास देण्याची त्यांची क्षमता तुम्हाला लक्षात येईल. जर त्यांना (शास्त्री) एखाद्या खेळाडूच्या क्षमतेवर विश्वास असेल तर, त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शास्त्रींपेक्षा दुसरी कोणताही चांगली व्यक्ती नाही. ते तुम्हाला रागवतील, पण त्याचबरोबर स्वत:ला चांगलं करण्यासाठी काय करावं लागेल हे देखील सांगतील."
शास्त्री यांचा विक्रम
रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असताना टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन मालिका जिंकल्या आहेत. हा ऐतिहासिक विक्रम करणारे ते एकमेव भारतीय प्रशिक्षक आहेत. त्याचबरोबर टीम इंडियानं दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये मर्यादीत ओव्हर्सची मालिका देखील जिंकली होती. शास्त्री मुख्य प्रशिक्षक असतानाच टीम इंडियानं 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. त्याचबरोबर यावर्षी जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये देखील प्रवेश केला आहे.
बॉलिंग कोच भरत अरुण यांचीही प्रशंसा
सुनील गावसकर यांनी यावेळी टीम इंडियाचे बॉलिंग कोच भरत अरुण यांचीही प्रशंसा केली. त्यांनी यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं उदाहरण दिलं. "ऑस्ट्रेलियात दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी करणाऱ्या कोणत्याही फास्ट बॉलर्सशी तुम्ही चर्चा केली तर ते भरत यांची प्रशंसा करतील आणि त्यांनी कसं मार्गदर्शन केलं हे सांगतील,'' असं गावसकर म्हणाले.
रोहित शर्मा, मॉर्गनला दंड बसल्यानं पीटरसन खूश, सांगितलं कारण
तरुण खेळाडूंनी शास्त्री आणि अरुण यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा. कारण स्वत:बद्दलचा संभ्रम दूर करुन योग्य मार्ग दाखवण्यासाठी त्यांच्यापेक्षा दुसरं कुणीही चांगलं नाही, असा सल्ला गावसकर यांनी दिला आहे.