मुंबई, 18 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट टीम (Team India) तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचली आहे. या दौऱ्यात पहिली टेस्ट झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे. विराटच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे टेस्ट टीमचा कर्णधार असल्यामुळे त्याच्याकडेच उरलेल्या तीन मॅचचं नेतृत्व देण्यात येईल, असं सांगितलं जात आहे, पण अनेकांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) ला टीमचं नेतृत्व देण्याची मागणीही केली आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार नाही.
आयपीएल (IPL 2020) मध्ये मुंबई (Mumbai Indians)चा पाचव्यांदा विजय झाल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) ला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्याची मागणी जोर धरू लागली. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar)याने या वादामध्ये उडी घेतली आहे. विराटच्या गैरहजेरीत रोहित ऑस्ट्रेलियात टीमचं नेतृत्व करू शकतो, त्याला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे, असं शोएब अख्तर म्हणाला.
कोहलीच्या इच्छेनुसारच सगळं होणार
'गोष्टी सरळ दिसत आहेत. कोहली टीमला पुढे घेऊन जाण्यासाठी खूप उत्सुक आहे. जर विराट कोहलीला थकवा जाणवत असेल, तरच टीम इंडियामध्ये वेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार बनवला जाऊ शकतो. 2010 पासून विराट खेळत आहे, त्यामुळे त्याचं नाव मोठं झालं आहे. कोहलीची इच्छा असेल, तरच दोन कर्णधार बनवले जातील. तेव्हाच रोहितला टी-20 टीमचं नेतृत्व मिळेल,' असं शोएब अख्तर म्हणाला.
'ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितला स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्ण संधी आहे. रोहितकडे टीमचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. कर्णधार आणि बॅट्समन म्हणून रोहितकडे बघण्यासाठी बरेच जण उत्सुक आहेत. जर रोहित स्वत:साठी आणि टीमसाठी चांगली कामगिरी करत असेल, तर कर्णधारपद वाटण्यावर चर्चा झाली पाहिजे,' असं मत शोएब अख्तरने मांडलं.