World Cupमध्ये घेतला पण विंडीज दौऱ्यातून वगळला, निवड समितीने सांगितलं कारण
वर्ल्ड कपच्या संघात मयंक अग्रवालला अचानक संधी मिळाली मात्र आता विंडीज दौऱ्यात एकदिवसीय संघातून वगळण्यात आलं आहे.

वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी संघ जाहीर केला. याआधी झालेल्या बैठकीला कर्णधार विराट कोहली उपस्थित होता. वेस्ट इंडीज दौऱ्यावर सलामीवीर शिखर धवनचे पुनरागमन झाले आहे तर कसोटी संघात यष्टीरक्षक वृद्धीमान साहा परतला आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेवेळी शिखर धवन दुखापतीने बाहेर पडला होता. त्याच्या जागी संघात ऋषभ पंतला घेण्यात आलं होतं. त्यानंतर अचानक विजय शंकर दुखापतीने स्पर्धेला मुकला. तेव्हा त्याच्याऐवजी संघात मयंक अग्रवालची वर्णी लागली.

मयंक अग्रवालच्या निवडीवरून त्यावेळी अनेकांनी संघाकडे इतर पर्याय नव्हते का? असे प्रश्न विचारले होते. आता वर्ल्ड कपच्या संघात निवड झालेल्या मयंकला विंडीज दौऱ्यातून वगळले आहे. त्याबद्दल एमएसके प्रसाद यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी सांगितले की, कोणतीही मालिका किंवा मोठ्या स्पर्धेदरम्यान आम्ही पत्रकार परिषद घेत नाही. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात होते.

प्रसाद म्हणाले की, पंतच्या निवडीवेळी असंही विचारण्यात आलं की, सलामीच्या फलंदाजासाठी मधल्या फळीतला फलंदाज खेळवला आणि पुन्हा मधल्या फळीत सलामीवर कसा घेतलात?

वर्ल्ड कपवेळी जेव्हा धवनला दुखापत झाली तेव्हा तिसरा सलामीवीर म्हणून केएल राहुल उपलब्ध होता. त्यावेळी आघाडीच्या फळीत डावखुरा फलंदाज नव्हता यासाठी पंतला संधी देण्यात आली. त्यावेळी पंतशिवाय कोणताही पर्याय नव्हता असं प्रसाद यांनी सांगितलं.

विजय शंकरला दुखापत झाली तेव्हा केएल राहुलसुद्धा सीमारेषेवर झेल घेताना दुखापतग्रस्त झाला होता. तो खेळण्याबाबत त्यावेळी शंका वाटत होती. अशावेळी एका बॅकअप ओपनरची संघाला गरज होती म्हणून मयंक अग्रवालला पाठवण्यात आलं.

आता शिखर धवन पुन्हा संघात आल्यानं विंडीज दौऱ्यावर त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळू शकलं नाही. मयंकला विंडीजविरुद्ध कसोटी संघात घेतलं आहे. त्याने 2 कसोटीत 195 धावा केल्या असून यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
First Published: Jul 22, 2019 09:16 AM IST