मुंबई, 22 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करण्याचं दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) स्वप्न भंग पावलं आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा (MI vs DC) 5 विकेट्सनं पराभव केला. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) या सामन्यात केलेल्या चुका दिल्लीच्या पराभवात निर्णायक ठरल्या. पंतनं या मॅचनंतर बोलताना त्याच्या चुकांचं खापर इतरांवर फोडलं आहे.
दिल्लीचा कर्णधार आणि विकेट कीपर असणाऱ्या ऋषभ पंतने (Rishabh Pant) टीम डेव्हिडला (Tim David) पहिल्याच बॉलला जीवनदान दिलं. शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) बॉलिंगवर टीम डेव्हिडच्या बॅटच्या एजला लागून बॉल ऋषभ पंतच्या हातात गेला. त्यावेळी अंपायरनं डेव्हिड नॉट आऊट असल्याचा निर्णय दिला. अंपायरच्या या निर्णयाला पंतनं दोन्ही रिव्ह्यू शिल्लक असूनही थर्ड अंपायरकडं आव्हान दिलं नाही.
टीम डेव्हिड बॅटिंगला आला तेव्हा मुंबईला विजयासाठी 33 बॉलमध्ये 65 रनची गरज होती. डेव्हिडने 11 बॉलमध्ये 309.09 च्या स्ट्राईक रेटने 34 रनची वादळी खेळी केली. पंतने डेव्हिडच्या पहिल्याच बॉलला डीआरएस घेतला असता, तर मॅचचं चित्र कदाचित वेगळं असतं.
IPL च्या धामधुमीत टीम इंडियाच्या खेळाडूचं लग्न निश्चित, पत्रिका Viral
ऋषभ पंतनं या मॅचनंचर बोलताना DRS न घेण्याचं कारण सांगितलं. 'बॉल बॅटला लागल्याचं मला वाटलं होतं. पण, सर्कलमध्ये उभे असलेल्या इतर खेळाडूंना याबाबत खात्री नव्हती. त्यामुळे मी DRS न घेण्याचा निर्णय घेतला,' असे पंतने सांगितले. 'या मॅचमध्ये आम्ही आमच्या रणनीतीची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलो. आम्ही बहुतेक काळ चांगल्या परिस्थितीमध्ये होतो. त्यानंतर निर्णायक क्षणी आमची पकड सैल झाली. आमच्याबाबतीत हा प्रकार संपूर्ण स्पर्धेत घडला. आम्ही यापासून धडा घेऊन पुढील सिझनमध्ये चांगले कमबॅक करू,' असे पंतने स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, Ipl 2022, Mumbai Indians