अहमदाबाद, 28 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) या दोन टीम सध्या चांगल्याच फॉर्मात आहेत. या टीममधील मंगळवारची लढत रंगतदार होणार असाच सर्वांना अंदाज होता. तो अंदाज खरा ठरला. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या त्या मॅचमध्ये आरसीबीनं दिल्ली कॅपिटल्सचा अवघ्या 1 रननं पराभव केला. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 6 रनची गरज होती. त्यावेळी त्यांचा कॅप्टन ऋषभ पंतला (Rishabh Pant) फोर मारता आला. त्यामुळे दिल्लीचा पराभव झाला.
दिल्लीच्या या पराभवामुळे ऋषभ पंत चांगलाच निराश झाला होता. त्यावेळी त्याची समजूत घालण्यासाठी सर्वप्रथम आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीनं धाव घेतली. मॅच संपल्यानंतर पद्धतीप्रमाणे विराट कोहली (Virat Kohli) प्रतिस्पर्धी टीमच्या खेळडूंशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आला. त्यावेळी त्यानं पंतच्या डोक्यावर हात ठेवून त्याचं सांत्वन केलं. तसेच इमोशनल झालेल्या पंतला धीर दिला.
विराट कोहली आणि पंतमधील हे संभाषण एवढ्यावरच थांबलं नाही. सर्व खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतरही हे दोघं मैदानात एकमेकांशी बोलत होते. त्यावेळी कोहलीनं पंतला बॅटींगचे काही धडेही दिले. पंत कोहलीचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता. तसेच यावेळी पंतचा मूड हलका करण्यासाठी कोहलीनं विनोद देखील केला. मॅच संपल्यानंतर कोहली आणि पंत या दोन वेगळ्या आयपीएल टीममधील कॅप्टनमधील संभाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे.
दिल्लीविरुद्धच्या या विजयासह आरसीबी पॉईंट्स टेबलमध्येही पहिल्या क्रमांकावर गेली आहे. विराटच्या टीमने 6 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे, तर दुसरीकडे दिल्लीची टीम 6 सामन्यात 4 विजय आणि 2 पराभवांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
'1 बॉलमध्ये 12 रनचा नियम करा' पीटरसनची ICC कडं मागणी
दिल्ली कॅपिटल्सची पुढील मॅच गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR) होणार आहे. तर रॉयल चँलेजर्सची पुढील मॅच पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध शुक्रवारी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.