मुंबई, 27 सप्टेंबर : पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) या सिझनमध्ये बिकट अवस्था झाली आहे. 19 सप्टेंबर रोजी यूएईमध्ये आयपीएल स्पर्धेचा सेकंड हाफ (IPL 2021, season 2) सुरू झाला. गेल्या आठ दिवसात झालेल्या तिन्ही मॅच मुंबई इंडियन्सनं गमावल्या आहेत. रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) मुंबईचा (MI) 54 रननं मोठा पराभव केला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर घसरली आहे. त्यामुळे आता या स्पर्धेतील उर्वरित 4 ही मॅच मुंबईसाठी 'करो वा मरो' असणार आहेत.
आयपीएल स्पर्धेत सध्या 'प्ले ऑफ' ची चुरस वाढली आहे. मुंबई इंडियन्सनं पहिल्या सिझनमध्ये चौथा क्रमांक पटकावला होता. त्यामुळे दुसऱ्या सिझनमध्ये ही टीम टॉप 2 मध्ये प्रवेश करेल अशी फॅन्सना अपेक्षा होती. मात्र त्यांची निराशा झाली आहे. पहिल्या सिझनमध्ये मुंबईनं 7 पैकी 4 मॅच जिंकल्या होत्या. या सिझनमध्ये त्यांनी सलग तीन मॅच गमावल्या असून त्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही.
आयपीएल 2021 च्या सध्याच्या परिस्थितीकडं पाहिलं तर दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या दोन टीमचा 'प्ले ऑफ' मधील प्रवेश निश्चित मानला जात आहे. आरसीबनंही 12 पॉईंट्सची कमाई केली असून त्यांनी तिसऱ्या क्रमांकावर भक्कम दावेदारी सादर केली आहे. तर चौथ्या क्रमांकासाठी कोलकाता नाईट रायडर्स (KKR), पंजाब किंग्ज (PBKS) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या टीमचं मुंबईसमोर कडवं आव्हान आहे.
IPL 2021: मुंबई इंडियन्सची कामगिरी का खालवली? वाचा कुठे होत आहे चूक
मुंबई, कोलकाता, पंजाब आणि राजस्थान या चारही टीमचे सध्या 8 पॉईंट्स आहेत. मुंबई, कोलकाता आणि पंजाब यांनी प्रत्येकी 10 सामने खेळले असून राजस्थाननं 9 सामने खेळले आहेत. त्यामुळे या टीमची स्थिती अन्य टीमपेक्षा चांगली आहे. या चार टीममध्ये कोलकाताचा रनरेट सर्वात चांगला असल्यानं ती टीम चौथ्या क्रमांकावर आहे. तर सर्वात कमी रनरेटमुळे मुंबईची टीम सातव्या क्रमांकावर आहे.
मुंबई इंडियन्सच्या पुढील चार मॅच अनुक्रमे पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. 'प्ले ऑफ' मध्ये पोहचण्यासाठी ही प्रत्येक मॅच मुंबईसाठी महत्त्वाची आहे. मुंबई विरुद्ध राजस्थान तसंच मुंबई विरुद्ध पंजाब या मॅचला तर आता 'करो वा मरो' चं महत्त्व प्राप्त झालं आहे. सनरायझर्स हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असलं तरी त्यांना हलकं लेखण्याची चूक मुंबईला करता येणार नाही. कारण, या टीममध्ये दुसऱ्या टीमचं 'प्ले ऑफ' चं गणित बिघडवण्याची क्षमता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Mumbai Indians