सिडनी, 29 नोव्हेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाने बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये खराब कामगिरी केली. याचसोबत भारतीय बॉलरनी निर्धारित वेळेत त्यांच्या 50 ओव्हर पूर्ण न केल्यामुळेही त्यांच्यावर टीका करण्यात आली. सिडनीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेत भारतीय टीमने 50 ओव्हर टाकायला 4 तासांपेक्षा जास्त वेळ लावला. त्यामुळे आयसीसीने टीमच्या सगळ्या खेळाडूंचं 20 टक्के मानधन कापलं. ऑस्ट्रेलियाचे माजी ऑलराऊंडर टॉम मुडी (Tom Moody) यांनी मात्र फक्त मानधन कापण्यापेक्षा आणखी कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
'वनडे क्रिकेटमध्ये ओव्हर रेट वाईट स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे टीमला रनचा दंड करा,' अशी मागणी करणारं ट्विट टॉम मुडी यांनी केलं आहे. अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी टॉम मुडी यांच्या या मागणीचं समर्थन केलं आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने उल्लंघन आणि प्रस्तावित दंड स्वीकारला आहे, त्यामुळे याप्रकरणाची अधिकृत सुनावणी आयसीसीने घेतली नाही. मैदानातले अंपायर रॉब टकर, सॅम नोगाजस्की, टीव्ही अंपायर पॉल रायफल आणि चौथे अंपायर गेरार्ड एबोड यांनी ही कारवाई केली. मी खेळलेली ही 50 ओव्हरची सगळ्यात जास्त वेळ चाललेली मॅच होती, असं ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ मॅचनंतर म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.