कॅनबेरा, 2 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडिया (India vs Australia) चा 13 रनने विजय झाला. या मॅचमध्ये भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja). जडेजाने या मॅचमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत त्याच्या टीकाकारांना विशेषकरुन संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. काहीच दिवसांपूर्वी जडेजासारखे क्रिकेटपटू वनडे क्रिकेटमध्ये योग्य वाटत नसल्याचं वक्तव्य संजय मांजरेकर यांनी केलं होतं. यानंतर जडेजाने तिसऱ्या वनडेमध्ये अर्धशतकीय खेळी केली.
तिसऱ्या वनडेमध्ये भारताने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 50 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 302 रन केले. हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांच्यात सहाव्या विकेटसाठी 150 रनची नाबाद पार्टनरशीप झाली. जडेजाने या मॅचमध्ये 50 बॉल खेळून 66 रन केले. जडेजाच्या या खेळीमध्ये 5 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. यानंतर बॉलिंग करत त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याची महत्त्वाची विकेट घेतली. आऊट झाला तेव्हा फिंच 75 रनवर खेळत होता, तसंच त्याने या मॅचमध्ये एक कॅचही पकडला.
संजय मांजरेकर यांनी भारतीय टीमच्या 11 खेळाडूंच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते. भारताने स्पेशलिस्ट बॅट्समन, स्पेशलिस्ट बॉलर आणि उत्तम ऑलराऊंडरलाच टीममध्ये घेतलं पाहिजे. मला जडेजाबद्दल काहीही अडचण नाही, पण तो बॅट किंवा बॉलने मॅच जिंकवू शकत नाही, असं मांजरेकर म्हणाले होते.
याआधी 2019 वर्ल्ड कपदरम्यानही जडेजा आणि मांजरेकर यांच्यात वाद झाले होते. त्यावेळी मांजरेकर जडेजाला बिट्स ऍण्ड पिसेस खेळाडू म्हणजेच थोडी बॉलिंग आणि थोडी बॅटिंग करणारा खेळाडू म्हणाले होते. यानंतर जडेजाने ट्विट करून मांजरेकर यांच्यावर निशाणा साधला होता. 'मी तुमच्यापेक्षा दुप्पट जास्त मॅच खेळलो आणि अजून खेळत आहे. लोकांचा आदर करायला शिका,' असं ट्विट जडेजाने केलं होतं.