सिडनी, 25 नोव्हेंबर : टीम इंडिया (Team India) च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या दौऱ्याआधी ऑस्ट्रेलियाकडून शाब्दिक हल्ले करायला सुरुवात झाली आहे. भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये आम्ही गैरवर्तणूक करणार नाही, पण आम्ही गप्पही बसणार नाही, असं ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लॅन्गर (Justin Langer) म्हणाले आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मैदानातल्या आणि मैदानाबाहेरच्या वर्तणुकीमुळे बरेच वाद निर्माण झाले होते. यावरून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती.
'ऑस्ट्रेलियात खेळताना अनेक खेळाडू दडपणाखाली असतात, असं लोक म्हणतात. मैदानातल्या स्लेजिंगमुळे नाही, तर उत्कृष्ट खेळाडूंविरोधात खेळत असल्यामुळे त्यांना तसं वाटत असेल. तुम्ही शेन वॉर्न, मॅकग्राचा सामना करत असाल, किंवा स्टीव्ह वॉ, रिकी पॉण्टिंग, एडम गिलख्रिस्टला बॉलिंग करत असाल, तर तुम्ही स्लेजिंगमुळे नाही, तर त्यांच्याविरुद्ध खेळत असल्यामुळे दडपणात असता,' असं लॅन्गर म्हणाला.
'मागच्या काही वर्षांमध्ये आम्ही आमच्या मैदानातल्या आणि मैदानाबाहेरच्या वर्तनाची चर्चा केली. गैरवर्तणुकीला कोणतंही स्थान नाही, पण शाब्दिक चकमकी होऊ शकतात. कर्णधार टीम पेन विनोदी आहे. विराट कोहली जे करतो ते आम्हाला आवडतं. मैदानात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचं दबावाशी देणघेण नाही. तुम्ही कोणाविरुद्ध खेळता, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात,' अशी प्रतिक्रिया लॅन्गरने दिली.