ओव्हल, 6 सप्टेंबर : भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याची या सीरिजमध्ये निराशाजनक कामगिरी सुरू आहे. रहाणे ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट झाला. या सीरिजच्या 7 इनिंगमध्ये रहाणेने फक्त 109 रन केल्या. या सीरिजमध्ये रहाणेनं 5, 1, 61, 18, 10, 14 आणि 0 रन केले आहेत. लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये रहाणेने अर्धशतक केलं, यानंतर त्याला मोठा स्कोअर करता आला नाही. रहाणेची बॅटिंग सरासरी 2015 सालच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या सीरिजनंतर (59 टेस्टनंतर) पहिल्यांदाच 40 पेक्षा खाली आली आहे.
या खराब फॉर्ममुळे रहाणेवर सध्या जोरदार टीका होत आहे. त्याचबरोबर ओव्हल टेस्ट ही त्याची शेवटची टेस्ट असेल, असं भाकित देखील अनेकांनी व्यक्त केलंय. या सर्व विषयावर टीम इंडियाचे बॅटींग कोच विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी मॅनजमेंटच्या वतीनं प्रतिक्रिया दिली आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर राठोड यांना पत्रकारांनी रहाणेच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी 'आत्ता नाही' असं उत्तर दिलं. यावेळी राठोड पुढं म्हणाले की, ' मी याबद्दल यापूर्वी देखील सांगितलं आहे. बराच काळ क्रिकेट खेळत असताना एक वेळ अशी येते की तेव्हा रन निघत नाहीत. त्या कालखंडामध्ये खेळाडूला टीमच्या पाठिंब्याची गरज असते. पुजाराच्या बाबतीतही आपण हेच पाहिलं आहे. त्याने काही महत्त्वाच्या खेळी टीमसाठी केल्या आहेत.
अजिंक्य रहाणे देखील लवकरच फॉर्ममध्ये येईल आणि भारतीय बॅटींगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी आम्हाला आशा आहे. रहाणेबद्दल काळाजी करावी अशी वेळ आली आहे, असं मला वाटत नाही.' असे राठोड यांनी यावेळी सांगितले.
IND vs ENG: चौथ्या दिवशी होतं टीम इंडियाला मोठं टेन्शन, बॅटींग कोचनं सांगितलं कारण
'तुम्ही इतकी महत्त्वाची सीरिज खेळत असताना परिस्थिती ही आव्हानात्मक असते. शिस्तबद्ध बॉलिंग अटॅकसमोर बॅटींग करणे हे अवघ आहे. तीच गोष्ट बॉलर्सनाही लागू आहे. बॅट्समन म्हणून टेक्निक या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आत्ता आलीय, असं वाटत नाही. सीरिज सुरु असताना किंवा मॅच सुरु असताना याबाबत विचार करणे योग्य नाही.' असं सांगत राठोड यांनी रहाणेचा बचाव केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.