मुंबई, 25 नोव्हेंबर : गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि आकाश चोप्रा (Aakash Chopra) दोघंही दिल्लीकडून स्थानिक क्रिकेट खेळले असले, तरी चांगले मित्र नाहीत. स्टार स्पोर्ट्सवर एका कार्यक्रमादरम्यान या दोघांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. सप्टेंबर महिन्यात गौतम गंभीरने धोनीवर आयपीएल (IPL 2020) मध्ये सातव्या क्रमांकावर खेळण्यावरून टीका केली होती. त्या मॅचमध्ये चेन्नई राजस्थानने ठेवलेल्या 217 रनच्या आव्हानाचा पाठलाग करत होती. गंभीरच्या या टीकेवर आकाश चोप्राने निशाणा साधला होता. गौतम गंभीर धोनीवर टीका करण्यासाठीच ओळखला जातो, असं आकाश चोप्रा म्हणाला होता.
या महिन्याच्या सुरुवातीलाही रोहित शर्मा (Rohit Sharma) ला टीम इंडियाच्या टी-20 टीमचं नेतृत्व दिलं जावं, अशी मागणी गंभीरने केली होती. पण आकाश चोप्राने ही मागणी योग्य नसल्याचं म्हणलं. रोहित शर्माला बँगलोरचं नेतृत्व दिलं तर तो यशस्वी होईल का? असा सवाल आकाश चोप्राने विचारत विराटचं समर्थन केलं होतं.
स्टार स्पोर्ट्सवर झालेल्या एका कार्यक्रमात आकाश चोप्रा आणि गौतम गंभीर समोरासमोर आले. टी-20 क्रिकेटमध्ये भारताचं नेतृत्व कोणी करावं? या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. त्यावेळी बोलताना गंभीर म्हणाला, विराट (Virat Kohli) खराब कर्णधार आहे, असं मी म्हणत नाही, पण रोहित उत्कृष्ट कर्णधार आहे. या दोघांमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे.
आकाश चोप्राचा विराटला पाठिंबा
पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी नवीन टीम बनवायला वेळ नसल्याचं आकाश चोप्रा म्हणाला. टी-20 वर्ल्ड कपआधी भारत पाच-सहा टी-20 मॅचच खेळणार आहे. विराटचं कर्णधारपद बदलावं, असं काहीच झालेलं नाही. ज्या गोष्टी तुटलेल्या नाहीत, त्या जोडण्यात काय अर्थ आहे? अशी प्रतिक्रिया आकाश चोप्राने दिली.
गौतम गंभीरचं प्रत्युत्तर
आकाश चोप्राचं हे मत गंभीरला पटलं नाही, गंभीरच्या हावभावावरुनच तो या वक्तव्यावर खुश नसल्याचं दिसलं. जर खेळाडूंना आयपीएल कामगिरीच्या आधारावर निवडलं जात असेल, तर कर्णधारही तसाच निवडा, असं गौतम गंभीर म्हणाला. आयपीएलसाठी भारताच्या कामगिरीला प्राधान्य दिलं पाहिजे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-20 कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहे, असं आकाश चोप्राने सांगितलं.
हे बोलत असताना गंभीरने नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवचं उदाहरण दिलं. आयपीएल कामगिरीच्या जोरावर यांची निवड होऊ शकते, मग रोहित शर्माला त्याच आधारावर कर्णधार बनवलं पाहिजे, असं गंभीर म्हणाला. याच उत्तर आकाश चोप्राला द्यायचं होतं, पण गंभीरने त्याचं बोलणं संपवलं.
King Kohli or The Hitman? Our experts share their opinion on what is a hot topic among fans currently - Who should lead Team India in T20Is?
Tune-in to find out, on #CricketConnected!
Every Monday | 2 PM & 9:30 PM | Star Sports Network & DisneyHotstar pic.twitter.com/FL2mI2TJpV
— Star Sports (@StarSportsIndia) November 23, 2020
पार्थिव म्हणतो रोहित पुढे
'इकडे कोण चांगला कर्णधार आहे, कोण टीमचं नेतृत्व चांगलं करू शकतो, याबाबत चर्चा सुरू आहे. माझ्या हिशोबाने रोहित शर्मा विराट कोहलीपेक्षा पुढे आहे,' असं पार्थिव पटेलला वाटतं.