मुंबई, 25 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final 2021) टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव झाला. या फायनलपूर्वी टीम इंडियाला एकही प्रॅक्टीस मॅच इंग्लंडमध्ये खेळायला मिळाली नाही. भारतीय टीम मार्च महिन्यात शेवटची टेस्ट मॅच खेळली होती. तर न्यूझीलंडची टीम इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये दोन टेस्ट खेळून फायनलमध्ये उतरली. दोन्ही टीमच्या तयारीचा फरक फायनलमध्ये बसला. टीम इंडियाला याचा मोठा फटका सहन करावा लागला. या पराभवानंतर बीसीसीआयला (BCCI) जाग आली आहे.
बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या माहितीनुसार सचिव जय शहा (Jay Shah) याबाबत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ECB) मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरीसन यांच्याशी चर्चा करणार आहेत. पाच टेस्टची सीरिज सुरु होण्यापूर्वी दोन प्रॅक्टीस गेम खेळण्याची संधी टीम इंडियाला मिळावी अशी मागणी शहा करणार आहेत.
टीम इंडियाचे खेळाडू आता साऊथम्पटनमधून लंडनला रवाना झाले आहेत. सर्वांना 20 दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे. या काळात ते ब्रिटनमधील वेगवेगळ्या ठिकाणी जातील. बहुतेक खेळाडूंना लंडन आणि आसपासचा परिसर माहिती असल्यानं ते लंडनमध्येच राहण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाचे काही खेळाडू टेनिस फॅन आहेत. विम्बल्डन स्पर्धेत प्रेक्षकांना परवानगी मिळाली तर काही जण टेनिस पाहण्यासाठी जातील. तर काही जण वेम्बलेमध्ये होणाऱ्या युरो कप मॅचचे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व खेळाडू 14 जुलै रोजी लंडनमध्ये एकत्र येतील. त्यानंतर ते नॉटिंगहमला रवाना होतील. तिथे पहिली टेस्ट मॅच होणार आहे.
संजय मांजरेकरचा पुन्हा जडेजावर निशाणा, पराभवानंतर विचारला प्रश्न
साऊथम्पटनमध्ये झालेल्या फायनल मॅचमध्ये टीम इंडियानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 139 रनचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान न्यूझीलंडनं 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या पराभवामुळे आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद जिंकण्याची टीम इंडियाची प्रतीक्षा आणखी लांबली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.