मुंबई, 31 डिसेंबर : कोरोना व्हायरस (Corona Virus) संक्रमणानंतर भारतात जानेवारी महिन्यापासून पुन्हा क्रिकेट सुरू होत आहे. त्यासाठी बीसीसीआय (BCCI) ने नव्या नियमांची घोषणा केली आहे. 30 पानांचा हा प्रोटोकॉल सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) आधी राज्य संघांना पाठवण्यात आला आहे. 10 जानेवारीपासून या टी-20 स्पर्धेला सुरूवात होणार आहे.
बॉलला लाळ लावता येणार नाही
बॉल स्विंग करण्यासाठी खेळाडू अनेकवेळा बॉलला लाळ लावायचे, पण आता खेळाडूंना असं करता येणार नाही. जर बायो बबलमध्ये नसलेल्या व्यक्तीच्या हातात बॉल गेला, तर अंपायर किंवा टीमला बॉल सॅनिटाईज करून घ्यावा लागेल. मॅचचं ठिकाण, खेळाडू राहणार असलेलं हॉटेल आणि प्रवास बायो बबलमध्येच करावा लागणार आहे. खेळाडू, सपोर्ट स्टाफ, मॅच अधिकारी आणि आयोजक तसंच प्रसारण करणारे कर्मचारी आणि कॉमेंटेटर यांनाही बायो बबलमध्ये राहणं बंधनकारक आहे.
मॅचशी संबंधित असलेल्या सगळ्यांना एकत्र आल्यानंतर सहा दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन केलं जाईल. आगमनाच्या आधी तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी आरटी-पीसीआर कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना बायो बबलमध्ये प्रवेश मिळेल. अपरिहार्य कारण असेल तरच बायो बबलच्या बाहेर जायला मिळेल, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. यासाठी टीमच्या डॉक्टरांची परवानगी घेणं आवश्यक आहे. या नियमांचं उल्लंघन केलं तर बीसीसीआय कडक कारवाई करेल, असा सज्जड दमही बीसीसीआयने दिला आहे.