मुंबई, 24 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या सीरिजमध्ये अंपायर्स कॉलच्या (Umpires Call) नियमांवरून बराच वाद निर्माण झाला होता. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) हा नियम अस्पष्ट आहे, तसंच यामध्ये बदल करण्याची मागणी केली होती. पण विराटची ही मागणी मान्य होणं कठीण आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) अध्यक्षतेखालच्या आयसीसी क्रिकेट समितीने (ICC Cricket Committee) अंपायर्स कॉलच्या नियमांमध्ये कोणतेही बदल न करण्याची शिफारस केली आहे.
क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीने अंपायर्स कॉलचा नियम आहे तसाच राहिल, असं सांगितलं आहे. या कमिटीमध्ये राहुल द्रविड, महेला जयवर्धने, एन्ड्र्यू स्ट्राऊस आणि शेन पॉलॉक यांच्यासारखे दिग्गज खेळाडू आहेत. अंपायर्स कॉलमध्ये बदल न करण्याची शिफारस प्रसारणकर्ते, मॅच अधिकारी आणि हॉक आय स्पेशलिस्ट यांच्याशी बोलून करण्यात आला.
30 मार्चला बोर्डाची बैठक
आयसीसी क्रिकेट बोर्डांची बैठक 30 मार्चला होणार आहे. या बैठकीतही अंपायर्स कॉलबाबत चर्चा केली जाईल. अंपायर्स कॉलच्या निर्णयावर विराटने नाराजी जाहीर केली होती. बॉल जर स्टम्पला लागत असेल, तर त्यावरूनच निर्णय घेण्यात यावेत, अशी मागणी विराटने केली होती.
आयसीसी क्रिकेट समिती सगळ्या पक्षांच्या सहमतीने निर्णय घेते. क्रिकेट समितीच्या शिफारसी सगळ्या बोर्डांकडे सहमतीसाठी पाठवण्यात आल्या होत्या आणि बीसीसीआयनेही याला सहमती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
भारतीय टीमचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्या तणावपूर्ण संबंधांशीही या गोष्टी जोडल्या जात आहेत. कुंबळेच्या अध्यक्षतेखालच्या समितीनेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलच्या नियमांमध्ये बदल केल्यानंतर रवी शास्त्री आणि विराट कोहली यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर विराट आणि अनिल कुंबळे यांच्यातले वाद चव्हाट्यावर आले होते. यानंतर अनिल कुंबळे यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Icc, India vs england, Virat kohli