जुन्नर 13 सप्टेंबर: कोरोना काळात सर्वत्र शाळा बंद आहेत मात्र पुणे जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात एक वेगळा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी राबवला आहे. जिथे मोबाइल रेंज नाही तिथे ऑनलाइन शिक्षण कसं पोहचणार हा प्रश्न होता यावर आयुष प्रसाद यांनी मार्ग काढला. विशेष म्हणजे हा उपक्रम देशात राबवणारी पुणे जिल्हापरिषद ही एकमेव जिल्हा परिषद आहे.
पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेलं जुन्नर तालुक्यातील कोपरे-मांडवे हे निसर्गसंपन्न गाव आहे मात्र या ठिकाणी ना मोबाईलची टिक-टिक वाजते ना बेसिक सोयी सुविधा. शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हे गाव विकासकांमासाठी दत्तक घेतले आहे मात्र इथल्या समस्या मात्र अद्यापही सुटलेल्या नाहीत.
कोरोना काळात इथल्या डोंगर कपारीत आणि वाड्या वस्तीवर राहणाऱ्या मुलांचं काय होणार ही सुद्धा समस्या होतीच. यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी आयुष प्रसाद यांनी एक आयडिया लढवली आणि पोरं जाम खुश झालीत.
कोरोनामुळे राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी शिक्षकांना आदेश देण्यात आले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आवश्यकता होती ती अँड्रॉईड मोबाईल आणि नेटवर्कची. त्यामुळे हा उपक्रम शहरी भागात व रेंज उपलब्द आहे अशा ग्रामीण भागात यशस्वी झाला.
'...म्हणून ठाकरे सरकारला देवेंद्र फडणवीसांची आठवण झाली', भाजपने व्यक्त केली शंका
कोव्हिड कालावधीत शिक्षकांना वर्क फ्रॉम होम ची सुविधा देण्यात आली होती परंतु राज्याच्या अप्पर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिलेल्या सूचनेनुसार पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहावे तसेच गावातील मोकळ्या जागेत समाज मंदिर, चावडी गावातील उपलब्ध असलेला एखादा हॉल शालेय परिसरातील मोकळी जागा क्रीडांगण किंवा इतर ठिकाणी विद्यार्थ्यांना पाचवी ते दहावीत शिकणाऱ्या पाच ते दहाच्या गटाने वेळेचे नियोजन करून कम्युनिटी क्लास म्हणजेच समुदाय वर्ग या माध्यमातून नियोजित शैक्षणिक अध्यापन करावे.
तसेच हे होत असताना जास्त गर्दी होणार नाही व कोरोना विषाणूचा फैलाव होणार नाही याबाबतची काळजी घेण्यात येऊन लॉकडाऊन बाबतचे सर्व नियम पाळण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत कोरोणा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये. ज्या विद्यार्थ्यांकडे सोशल,इलेक्ट्रॉनिक माध्यमांची उणीव आहे त्यांच्यापर्यंत शिक्षकांनी प्रत्यक्ष जाऊन अशा विद्यार्थ्यांना अध्यापन करावे आणि या सगळ्यावर दर आठवड्याला केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक यांनी एकत्रित अहवाल करून जिल्हा परिषदेला पाठवावा असं म्हटलं आहे.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद झाल्याने जुलै महिन्यात या आदिवासी भागातील कोपरे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता निर्मल व शिक्षक शैलेंद्र देवगुणे यांनी या उपक्रमाला शिक्षक मित्रांच्या सहकार्याने सुरुवात केली. आदिवासी भागात बऱ्याच ठिकाणी मोबाईल व नेटवर्क नसल्याने या दुर्गम आदिवासी भागात शाळा बंद झाल्याने व नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणारच असे वाटत होते.
भीती दूर करणार! कोरोना लशीचा पहिला डोज घेण्याची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची तयारी
मात्र अत्यंत दुर्गम आदिवासी समजल्या जाणाऱ्या कोपरे-मांडवे, मुथाळणे, पुतांचीवडी, जांभुळशी, या भागातील आश्रमशाळेसह जिल्हा परिषदेच्या शाळेतील शेकडो विध्यार्थी यावर्षी शिक्षणापासून वंचित राहतात की काय? अशी भीती असतानाच याच भागातील पूजा विठ्ठल कवटे, शंकर गेनू माळी, उमेश बुधा माळी, निलेश रमेश माळी, रवींद्र मनोहर मुठे,गणपत नामदेव मुठे,पांडुरंग जयराम माळी, अंकुश हरिभाऊ माळी, महेंद्र बुधा माळी, या पदवीधर व उच्चपदवीधर तरुण स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला.
स्थानिक शिक्षकांच्या सहकार्याने "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद पण शिक्षण चालू" या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने मुलांना शिकविण्यास पुढाकार घेतला व शिक्षकमित्र म्हणून काम करायचे ठरविले ज्यामुळे या दुर्गम आदिवासी मुलांचा शिक्षण प्रवाह चालू राहण्यासाठी मदत झाली आहे.
हे सर्व शिक्षकमित्र गटागटाने व कोरोनाच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करून मुलांना शिकवत आहेत. या स्वयंसेवक शिक्षकमित्रांचे आपल्या आदिवासी बांधवावरील शैक्षणिक प्रेम पाहून कोपरे जांभुळशी ग्रुप ग्रामपंचायतच्या माजी सरपंच हौसाबाई काठे, विद्यमान सदस्य विठ्ठल कवटे, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते सुनिल माळी यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना आपण दत्तक घेतलेल्या कोपरे -जांभुळशी भागातील नेटवर्किंग ची समस्या दूर करण्यासाठी टॉवर लवकरात लवकर सुरु करावे यासाठी विनंती पत्र लिहिले आहे.
जिल्हा परिषदेच्या कम्युनिटी स्कुल उपक्रमाच्या पुढे जात या गावातल्या माजी विद्यार्थ्यांनीही पुढाकार घेत "शाळा बंद पण शिक्षण चालू!" या उपक्रमाची जोड देत स्वतः खारीचा वाटा उचलला. केमस्ट्री मध्ये MSC झालेली पूजा कवटे 5वी ते दहावीच्या मुलांना मारुती मंदिरात शिकवताना दिसली.
पीक अप शेडमध्ये उमेश माळी 1 ली ते 5वीला शिकवत होता आणि गावा बाहेरील समाज मंदिरात 9वी मध्ये शिकणारी स्वाती कवटे अंगनवाडीततल्या चिमुरड्या मुलांना शिकवत होती.
इन्फोसिस उभारणाऱ्या सुधा मूर्तींच्या साधेपणाची पुन्हा चर्चा, पाहा PHOTO
हा उपक्रम मागील महिन्या पासून इथे अविरतपणे सुरू आहे. या उपक्रमाचे गावक-यांनीही मोठं कौतुक केलं आहे. शिक्षक आणि माजी विद्यार्थी एकत्र आल्याने गावातली मुलं शिक्षणाबाहेर राहणार नाहीत याचंही समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं
जिल्हा परिषदेच्या या उपक्रमात गावातील माजी विद्यार्थी सहभागी झाले आणि "शाळा बंद पण शिक्षण चालू" उपक्रम राबवला गेला. यामुळे कोणत्याही सुविधा नसताना आदिवासी आणि दुर्गम भागातली ही पोर कुरकुर न करता शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. हा उपक्रम इतरही जिल्ह्यातल्या आदिवासी भागात यशस्वी झाला असता तर सुविधा नसणाऱ्या मुलांना फायदा होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: School