पुणे, 5 जानेवारी : पुण्यामध्ये आज बऱ्याच दिवसांनी शरद पवारांनी राष्ट्रवादीची तालुका निहाय बैठका घेत कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. पण याच बैठकीत कार्यकर्त्यांमधली गटबाजी तर उघड झालीच पण वेल्ह्यातील एका कार्यकर्त्यांनी सुप्रियाताईंऐवजी चक्क अजितदादांनाच तालुक्यात लक्ष घालण्याची थेट मागणी केली, यामुळे पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमधील खदखद बाहेर आली आहे.
पक्षातील गटतट दूर झाले तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता येईल. कात्रज दूध संघ, पीएमआरडीए या कमिट्यांवर पक्षातील पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली नाही. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात रोजगार नसल्यामुळे अनेक कुटुंब तालुक्यातून शहरात जात आहेत, त्यामुळे तालुका विस्थापित होत आहे. हे लक्षात घेऊन नवनवीन रोजगार कसे येतील यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. यासह असंख्य समस्या आणि पक्षातील अंतर्गत गटबाजीचा पाढा पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांसमोर वाचला.
हे कार्यकर्ते बाहेर आल्यानंतर त्यांनी मात्र मोठा बॉम्ब फोडला. वेल्हे तालुक्यात खासदार सुप्रियाताई सुळे या समजुतदारपणे कुणाला दुखावत नसल्यामुळेच गटबाजी फोफावली आहे. तालुक्यातली गटबाजी संपवायची असेल तर अजितदादांनाच वेल्हे तालुक्यात लक्ष घालायला सांगा, अशी मागणी आपण पवार साहेबांकडे केल्याचं राष्ट्रवादीचे वेल्ह्याचे माजी तालुकाध्यक्ष शंकर भरूक यांनी केली आहे. माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील पक्षात गटबाजी असल्याचं प्रांजळपणे कबूल केलं आहे.
पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये अनेकता राष्ट्रवादीचेच गटतट समोरासमोर लढताना दिसतात आणि विरोधकांना याच दुहीचा अप्रत्यक्ष फायदा झाला आहे. विशेषत: भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातही कदाचित यामुळेच काँग्रेसची सत्ता येत असल्याची खंत पक्ष कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे. म्हणूनच या पक्षांतर्गत गटबाजीवर पवार कुटुंबिय ठोस तोडगा काढणार का तसंच भिजत घोंगडं ठेवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, NCP, Sharad Pawar, Supriya sule