पुणे, 3 ऑगस्ट : पुणे (Pune) आणि आजूबाजूच्या परिसराला अद्यापही गढूळ पाण्याचाच (Muddy Water) पुरवठा (Supply) होत असल्याचं दिसून आलं आहे. पुण्याला ज्या धरणातून पाणीपुरवठा होतो, त्या खडकवासला धरणातील (Khadakwasla Dam) पाणी पूर ओसरला तरी गढूळच आहे. यामागे मोठं पर्यावरणीय (Environmental reasons) कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
गढूळतेमागचं कारण
पुण्यातील खडकवासला धरणाची गढूळता 200 टर्बिडिटी युनीटनं वाढली आहे. त्यामुळे पूर ओसरून आठवडा उलटला तरी पुणेकरांना मिळणारं पाणी अद्यापही गढूळच आहे. पश्चिम घाट परिसरात विकासाच्या नावाखाली झालेली निसर्गाची हानी याला कारणीभूत असल्याची माहिती जलतज्ज्ञ उपेंद्र धोंडे यांनी दिली आहे. पश्चिम घाटातील वेगवेगळ्या विकासकामांसाठी टेकडीफोड करण्यात आल्याचा हा परिणाम असल्याचं ते म्हणाले.
गढूळतेचं गणित
पाण्याची गढूळता मोजण्यासाठी NTU म्हणजेच Nephelometric Turbidity Units हे एकक वापरलं जातं. सामान्य परिस्थितीत पाण्याच्या गढूळतेचं प्रमाण 1 ते 5 NTU असतं. 2015 साली धरण तळाला गेलं होतं. त्यावेळी त्या पाण्यातील गढूळतेचं प्रमाण 150 NTU इतकं होतं. तर या वर्षीच्या पाण्याची गढूळता 200 NTU नोंदवण्यात आली आहे.
हे वाचा -राज्यपालांनी मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करू नये - नवाब मलिक
पर्यावरणाला जपण्याचा सल्ला
पर्यावरणाची हानी झाल्यामुळेच पाण्याची गढूळता वाढत असल्याचं सिद्ध होत आहे. टेकड्या फोडणे, डोंगर फोडणे, जलाशयाच्या भागात मानवी अतिक्रमण, नदीपात्रात बांधकामे करणे यासारखे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढत असल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असल्याचं चित्र आहे. पुण्यातील खडकवासला धरणाचे पाणी पूर ओसरून आठवडा उलटला तरी गढूळच असल्याचे दिसत असल्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. यामुळे आरोग्याचेही अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनियंत्रित विकास करताना त्याचा परिणाम पुन्हा मानवालाच भोगावा लागत असल्याचं हे उदाहरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Environment, Pune, Watersupply पाणीपुरवठा