पुणे, 24 जून : राज्यात पुढील आठवड्यात पावसाचं (Monsoon rains) प्रमाण कमी होणार असून उकाडा (Heat) वाढणार असल्याचा इशारा ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी ट्विट करून राज्यातील हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसानंतर अनेक शेतकरी पेरणीची घाई करू शकतात, मात्र पुढील आठवड्यात पाऊस गायब होण्याची चिन्हे असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.
जून आठवडा हा जून महिन्यातील शेवटचा आठवडा आहे. राज्यात मान्सून आल्याची घोषणा होऊन 15 दिवस उलटून गेले आहेत. त्यात गेल्या आठवड्यात राज्यातील विविध भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडून गेला आहे. त्यामुळे पेरणीसाठी हीच योग्य वेळ असल्याचा समज शेतकऱ्यांचा होऊ शकतो. मात्र पेरणी केल्यावर पाऊस गायब झाला, तर शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे मान्सूनचा पाऊस पुन्हा सक्रीय होण्याअगोदर शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असा सल्ला होसबाळीकर यांनी दिला आहे.
राज्यातील तापमानामध्ये परत एकदा वाढ होताना दिसत असून IMD ने पूर्वानुमान दिल्या प्रमाणे राज्यात येत्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे, तेव्हा शेतकऱ्यांनी पेरणीची कृपया घाई करू नये व IMD व कृषी विभाग कडून मिळणारे सल्ले उपयोगात आणावे pic.twitter.com/au66W7goXP
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 23, 2021
पुन्हा ‘दुबार पेरणी’चं संकट नको
गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येत असल्याचं दिसतं. जून महिन्यात पाऊस हजेरी लावतो. त्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरण्या करतात. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाल्यामुळे लावलेल्या पिकांचं नुकसान होतं. उन्हाळ्यात शेतातील विहीरींचं पाणी संपलेलं असतं. अशात पाऊसही गायब झाल्यामुळे पेरलेलं बियाणं करपून जातं आणि शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड सोसावा लागतो. पाऊस गायब होण्याचा हा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून दिसत असून हे संकट टाळण्यासाठी हवामान खात्याच्या अंदाजावर शेतकऱ्यांनी लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.
हे वाचा - रामदेव बाबांनी ठोठावले SCचे दरवाजे, देशभरातून दाखल FIR रोखण्यासंदर्भात याचिका
बदलतं निसर्गचक्र
गेल्या काही वर्षात निसर्गचक्र बदललं असून प्रत्येक ऋतु हा साधारण एक ते दीड महिन्यांनी पुढं गेल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासन जुलै महिन्याच्या उत्तरार्धात मान्सूनचा सलग पाऊस सुरु होत असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणं नवरात्रोत्सव आला तरी पावसाळा सुरुच राहत असल्याचं दिसतं. अनेकदा तर दिवाळीतही पावसाच्या सरींचा शिडकावा होताना दिसतो. या बदलत्या ऋतुचक्राचा विचार करून शेतकऱ्यांनी शेतीचं नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Monsoon, Rain, Weather forecast