पुणे, 5 फेब्रुवारी : कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाविकासआघाडीला विनंती केली आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार, अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्र लिहून दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचा आग्रह धरला आहे.
एकीकडे भाजप, मुख्यमंत्री तसंच राज ठाकरे बिनविरोध निवडणुकीसाठी आग्रही असताना महाविकासआघाडी मात्र निवडणुका लढण्यावर ठाम आहे. कसबा पेठमधून सोमवारी काँग्रेस उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा नाना पटोले यांनी केली आहे. तर याआधी पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली नव्हती, अशी आठवण अजित पवारांनी करून दिली आहे.
कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक लढण्यावर महाविकासआघाडी ठाम असतानाच वंचित बहुजन आघाडीने गुगली टाकला आहे. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युती झाल्यानंतर कसबा आणि चिंचवडमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराला पाठिंबा द्यायचा निर्णय झाला होता. मात्र या दोन्ही ठिकाणी शिवसेना लढत नसल्याचं दिसत आहे. महाविकासआघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा अद्याप काही संबंध नसल्याने या दोन्ही जागांसंदर्भात पक्षाच्या वतीने लवकरच भूमिका जाहीर करण्यात येईल, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तसंच प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितलं आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या या भूमिकेचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शिवसेना-वंचितची युती झाल्यानंतर महाविकासआघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली. प्रकाश आंबेडकर यांनी तर शरद पवार भाजपसोबत असल्याचा गौप्यस्फोट केला. तसंच आपली युती शिवसेनेसोबत झाली आहे, महाविकासआघाडीमध्ये जायची आपल्याला इच्छा नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.