पुणे, 28 सप्टेंबर: मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हवामान बदलाचा परिणाम थेट महाराष्ट्रावर होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low pressure area in bay of bengal) राज्यात मागील दोन आठवड्यापासून कोसळधार सुरू (Rain in maharashtra) आहे. रविवारी मध्य रात्री बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं गुलाब चक्रीवादळ (Cyclone Gulab Update) आता शमलं आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर गुलाब चक्रीवादळ धडकल्यानंतर त्याचा वेग कमी होऊन चक्रीवादळाचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झालं आहे.
त्याचा परिणाम म्हणून मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. काल मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून धरणं आणि नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. पण अजून संकट संपलं नाही. पुढील 48 तास राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गुलाब चक्रिवादळाचे आता राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे 48तास राज्यावर दिसतील. येत्या 24तासात,मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार व अतीवृष्टीची पण शक्यता. मुंबई,ठाणे पण.विदर्भात प्रभाव कमी. उद्या उ कोकण व उ मध्य महाराष्ट्र मध्ये प्रभाव राहील -IMD pic.twitter.com/sb2syKG56i
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 28, 2021
आज पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि जळगाव या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुण्यासह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार आणि धुळे या पंधरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा देखील दिला आहे. तर गोंदिया भंडारा आणि गडचिरोली ही तीन जिल्हे वगळता उर्वरित राज्यात आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा-या ड्रिंक्समुळे पॉझिटिव्ह येऊ शकतो कोरोना रिपोर्ट; समोर आली धक्कादायक बाब
उद्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होत असला तरी, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. उद्या नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे आणि रायगड या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या पुणे आणि मुंबईला देखील येलो अलर्ट देण्यात आला असून याठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. पण गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather forecast, महाराष्ट्र